नाशिक :नाशिकसह राज्यभरातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम (Galap Hangam) मार्चअखेरीस संपला. महाराष्ट्रात हंगामात साखर कारखान्यांनी अंदाजे ९०० लाख टन उसाचे गाळप करून ७९२.५९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik District Sugar Factory) चार साखर कारखाने मिळून १० लाख २६ हजार ४०६ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले.
जिल्ह्यात यंदादेखील सटाणा तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना (Dwarkadhish Sugar Factory) ऊस गाळपात अव्वल राहिला. या कारखान्याने ४ लाख ६३ हजार ६२१ क्विंटल साखरेचे उत्पादन काढले. मागील वर्षीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १० लाख ५८ हजार २३८ क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा काढला होता. जिल्ह्यात सरासरी साखर उतारा ६.८१ टक्के आहे.
सन २०२५च्या हंगामात देशातील उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. उसाचे गाळप गेल्या वर्षीपेक्षा कमी झाल्याने यंदाचा हंगाम लवकर आटोपला. यंदा साखर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ५० ते ६० लाख टनांनी कमी झाले. आतापर्यंत साखर उताराही कमी मिळाला, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने स्पष्ट केले.
दमदार पावसानंतरही हंगाम लवकर
साखर उतारा १० ते ११ टक्के राहिला आहे. साखर उत्पादनात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी कादवा सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल ठरण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला होऊनही ऊस गाळपाचा हंगाम लांबला नाही. याउलट लवकर संपला.
विभागात २६ साखर कारखाने
अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात २६ साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरू होते. अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७.४६ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात सरासरी ६.८१ टक्के साखर उतारा आहे.
उसाचे गाळप असे (मेट्रिक टन)
- कादवा (ता. दिंडोरी) ३२१०३८.८२२ मेट्रिक टन
- द्वारकाधीश (शेवरे, ता. सटाणा)। ४६३६२१. ००० मेट्रिक टन
- नासाका (ता. नाशिक) १२७०२३ मेट्रिक टन
- एस. जे. शुगर के. (रावळगाव)। ११४७२४.०१२ मेट्रिक टन