Join us

Chilly Export : शिरवाडेची मिरची इंग्लंडला रवाना, सेंद्रिय पद्धतीने सामूहिक शेतीतून साधली क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 12:57 PM

Chilly Export : नाशिकच्या शिरवाडे (Shirwade) येथील पाच शेतकऱ्यांनी पिकवलेली मिरची थेट (Chilly Export) विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना झाली आहे. 

नाशिक : निसर्गाचा लहरीपणा, रासायनिक खते औषधे यांचे गगनाला भिडणारे दर, वाढता उत्पादन खर्च, त्या तुलनेत उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारा भाव यामुळे आज शेतीला अच्छे दिन नाहीत, मात्र खर्चात बचत करत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब, विषमुक्त शेतीकडे वाटचाल तसेच सामूहिक शेतीचा प्रयोग करून नाशिकच्या (Nashik) शिरवाडे येथील पाच शेतकऱ्यांनी पिकवलेली मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना झाली आहे.      प्रचंड इच्छाशक्ती असली की, माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही चांगल्या पद्धतीने मात करू शकतो, याचे आदर्श उदाहरण म्हणजे निफाड (Niphad Taluka) तालुक्यातील शिरवाडे येथील विजय आवारे, प्रमोद आवारे, रमेश शेळके, अनिल आवारे, भूषण आवारे हे प्रयोगशील शेतकरी. रमेश केदु शेळके व सुरेश केदु शेळके यांनी अत्यंत क्षारपड जमिनीत उत्तम टोमॅटो, मिरची व द्राक्षे पीक घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. शेळके बंधू यांची जमीन क्षारपड. पाणीही अत्यंत खराब. जमिनीचा सामू ११ च्या वर तसाच पाण्याचाही सामू १० च्या वर, त्यामुळे कोणत्याही पिकाची वाढ होत नसे. या जमिनीत केवळ जनावरांचा चारा व गहू हेच पीक येत होते. शेळके बंधूनी यावर अनेक कृषी तज्ञांचे मत घेतले. 

रासायनिक खतांचा वारेमाप वापर केला. महागडी रासायनिक औषधे फवारणी केली. मात्र, शेती उत्पादनात फारसा फरक पडला नाही. उत्पादन कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती झाल्याने शेळके बंधूंची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. त्यामुळे शेळके बंधू हतबल झाले होते. नगदी पिकाशिवाय आर्थिक स्थिती सुधारणार नाही हे त्यांनी ओळखले आणि या परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम गोड पाणी उपलब्ध केले व ते एक तळ्यात साठवले, त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला तरी जमिनीचा सामू जास्त होता. पिकाला पाणी दिले तरी जमिनीवर पांढरा थर येत असे. 

विषमुक्त मिर्चीतुन चांगलं उत्पादन 

धामोरी येथील सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत मिरची लागवड केली. शेणखत टाकून त्यावर खतांचा मूळ डोस म्हणून रासायनिक खते न टाकता गांडूळ खत व इतर सेंद्रिय खते टाकली. बोदावर ठिबक सिंचनच्या सहाय्याने सिंचन व्यवस्था करून अल्प पाण्याचा वापर करून ते फक्त मुळाशी कसे राहील, याची व्यवस्था केली. त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन केले. पीक वाढीसाठी त्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून वेळोवेळी गांडुळ खत पाण्याचा वापर केला. त्यामुळे मुळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली. जिवामृताची फवारणी केली. त्यामुळे पीक बहरून आले. शेतीतील या बदलामुळे त्यांना चांगली आर्थिक आवक तर झाली. 

निसर्गाच्या अमूल्य अन्नपद्धतीत गांडुळांची भूमिका महत्त्वाची होती. सुपीक जमिनीत जीवाणूंच्या सहभागापेक्षा गांडुळे जास्त महत्त्वाची असतात. रासायनिक खतांमुळे जमिनीत उष्णता निर्माण झाल्यामुळे, गांडुळे खाली आणि खाली सरकतात, मल्टिप्लायर जमिनीत असे वातावरण निर्माण करतात, ज्यामुळे दुसऱ्या वर्षी गांडुळे वर येऊन खत बनवायला सुरुवात करतात. दरवर्षी एक एकर क्षेत्रात वर्षभर लागवड केलेल्या जमिनीत १२० टन गांडुळ खत बनते. त्यामुळे बाहेरून एक रुपयाचे सुद्धा खत टाकण्याची गरज नाही. - सुनील शिंदे, सेंद्रिय शेती मार्गदर्शक

आज शेती ही पूर्णपणे रासायनिक प्रक्रियेवर अवलंबून आहे, मात्र तिलाही सेंद्रिय शेतीची जोड दिल्यास उत्पादन खर्च निम्म्यावर येतो. शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर केला असता फुगवण, त्याची साठवणूक क्षमता, चव व चकाकी यात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने उच्चांकी उत्पादन येईल. - रमेश शेळके, शेतकरी 

शेतकऱ्यांना पिकवता येते, मात्र विकता येत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक लूट होते. शेतकऱ्यांना विषमुक्त शेती विषयक मार्गदर्शन करून सध्या एक टन मिरचीचे प्लाटून इंग्लंडच्या सुपर मार्केटसाठी रवाना करण्यात आले आहे. पुढील वर्षी सामूहिक शेतीतून १५ एकरावरील मिरची पाठविण्याचा निर्धार आहे.- अजय आवारे, कृषक मित्र ऍग्रो सर्व्हिसेस प्रा.लि 

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डमिरचीशेतीइंग्लंड