Join us

Agriculture News : .... तरच केळीला बोर्ड भाव मिळणे शक्य, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 4:44 PM

Banana Farming : केळीच्या मालाला बोर्ड भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) यावल तालुक्यातील भालोद परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, केळीच्या मालाला बोर्ड भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत. केळी लागवडीसाठी (Banana Cultivation) मोठा खर्च येतो. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी पिकाला मोठा फटका बसत आहेत. त्यात व्यापाऱ्यांकडून बोर्ड भाव मिळत नाही. बाजार समितीने केळी उत्पादकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

केळी लागवडीपासून ते उत्पन्न मिळेपर्यंत या पिकाला खर्च येतो. केळीच्या (Banana Farm) मालाला बोर्ड भाव मिळत नसल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. केळीच्या मालाला पुरेसा भाव मिळत नाही, त्या तुलनेत बियाणे व रासायनिक खतांचे भाव मात्र अधिक आहेत. मजुरीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने केळीला बोर्ड भाव मिळेल, असे ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. आधीच विहिरी, कुपनलिकेची जलपातळी खालावली आहे.  पुरेसे पाणी नसल्याने लागवड क्षेत्र घटत आहे. बळीराजा दिवस रात्र एक करत केळीची जगवत आहे. मात्र, त्यास पुरेसा भाव मिळत नाही. 

केळीचे पीक जोखमीचेगेल्या काही सी.एम.व्ही अर्थात कुकुंबर मोझेंक व्हायरसमुळे केळी उपटून फेकावी लागत आहेत तसेच करपा रोगामुळे केळी पीक धोक्यात येते. दरवर्षी अवकाळी व वादळाने केळी बागा जमीनदोस्त होतात. तसेच केळीचे पीक नाशवंत असल्याने या पिकाला अधिक उष्ण व अधिक थंड वातावरणही सहन होत नाही. या भागात उन्हाळ्यात ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान असते तर हिवाळ्यात तापमान घसरते, यामुळे केळीचे पीक धोक्यात येते. केळी पीक जोखमीचे झाले आहे. त्यास योग्य भाव शासनाने द्यावा, अशी मागणी उत्पादकांकडून होत आहे.

शेतकऱ्यांची तीन टक्क्याची लूट

शेतकरी नीळकंठ पिंपळे म्हणाले की, केळी परिपक्च झाल्यानंतर उत्पादक शेतकरी जास्त वेळ शेतामध्ये ठेवू शकत नाही. याचा फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांचा उच्च प्रतीचा केळीला बोर्ड भावापेक्षा कमी भावाने खरेदी करतात. केळी नाशवंत असल्याने तिला वेळेवर विकणे केळी उत्पादकांना गरजेचे असते. तर अतुल जावळे म्हणाले कि, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी उत्पादकांना तीन टक्क्याची सूट व्यापारी वर्गास देण्याचे पूर्वी नियोजित केले होते. मात्र बाजार समितीने हे बंद केल्यावरही केळी व्यापारी शेतकऱ्यांची तीन टक्क्याची लूट करीतच आहेत. केळी बोर्ड भावा पेक्षा अल्प असा भाव गेल्या अनेक दिवसांपासून मिळत आहे. 

तर केळी बोर्ड भाव देणे शक्य.... 

भुसावळ येथील केळी व्यापारी अक्षय चौरसिया म्हणाले की, बाजारात आंब्यांची मागणी आहे. उत्तर प्रदेशात आंबा हा ५० रुपयाला तीन किलो मिळत असल्याने केळीला बोर्ड भाव देणे शक्य नाही. गुजरात, नांदेड, उत्तरप्रदेश व आंध्र प्रदेशात केळीची मागणी वाढल्यावर केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी बोर्ड भाव देणे शक्य होईल. तर माजी सरपंच तथा केळी उत्पादक नितीन चौधरी म्हणाले कि, केळीला बोर्ड भावापेक्षा नेहमीच केळी व्यापारी सुमारे ५०० ते ७०० रुपये प्रतिक्चिटल कमी फरकाने भाव देतात. ही केळी उच्च प्रतीच्या मालाची असते.

टॅग्स :केळीशेतीशेती क्षेत्रजळगावमार्केट यार्ड