Join us

रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा शुभारंभ, थेट शेतातच 2 टन द्राक्षांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 7:31 PM

नाशिकमध्ये रंगीत द्राक्ष वाणांच्या 2 टनाहून अधिक द्राक्षांची विक्री व ऑनलाईन लिलाव थेट शेतातच करण्यात आला.

नाशिक : राज्यातील शेती उद्योगात उत्सुकतेचा विषय बनलेल्या नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा शुभारंभ अयोध्येतील राममुर्तीच्या प्रतिष्ठापना दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला. ‘सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकारातून आयात करण्यात आलेल्या या नव्या वाणांच्या द्राक्षांची पहिली खुडणी काल झाली. या वाणांच्या द्राक्षांची थेट शेतातच विक्री व ऑनलाईन लिलाव करण्यात आला. यात 2 टनाहून अधिक द्राक्षांची विक्री झाली. थेट शेतात झालेल्या लिलावाचा हा देशातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे.  

सह्याद्री आळंदी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक कैलास माळोदे यांच्या शेतात यावेळी आरा रंगीत द्राक्ष वाण पाहणी व विक्री दिवसाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक व खरेदीदार व्यापाऱ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लिलावात 2 टन द्राक्ष माल विकला गेला. या शिवाय जिल्ह्यातील ग्राहकांनी अवघ्या 2  तासात 336 किलो द्राक्षांची खरेदी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापुढील काळात ही ऑनलाईन लिलाव व खरेदी विक्री प्रक्रिया अधिक गतिशील व पारदर्शक करण्यात येणार असल्याचे विलास शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

ऑनलाईन लिलावाचा अनोखा उपक्रम 

पेटंट द्राक्ष वाणांची चव, टिकवणक्षमता सरस असल्यामुळे देशभरातील व्यापारी खरेदीसाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. या वाणांची खरेदी करण्यासाठी तयार असलेल्या देशातील लुधियाणा, मुंबई, काठमांडू, सिलिगुडी, गुवाहाटी, कोलकाता, अहमदाबाद येथील खरेदीदार व्यापाऱ्यांना या वाणांची व लिलावाची पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यानुसार देशाच्या विविध भागातील खरेदीदारांनी यावेळी  कॉन्फरन्स कॉल द्वारे लिलावात सहभाग नोंदवला. यावेळी द्राक्षाच्या 4.8 किलोच्या पेटीला 1250 रुपये दर मिळाला.  

पारोळ्याच्या प्रकाश पाटलांची खजुराच्या शेतीतून हवामान बदलावर यशस्वी मात

नव्या वाणांचा पुढील विक्री दिवस 26 ला  

नव्या आरा रंगीत द्राक्ष वाणांचा दुसरा पाहणी व विक्री दिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोने येथे येत्या 26 जानेवारीला भास्कर कांबळे यांच्या मळ्यात होणार आहे. त्याचा लाभ शेतकरी व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.  यावेळी उपस्थित असलेले राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले की, गोड, रसाळ चवीचे उत्तम द्राक्षवाण आणि सरस मार्केटींग या दोन गोष्टींच्या जोरावर शेतीत क्रांती घडतांना दिसत आहे. तरुण ध्येयवादी शेतकऱ्यांनी हे काम गतीने पुढे न्यावे.‘‘ तर राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले की, ‘पेटंट वाणांमुळे दर्जेदार द्राक्ष वाणांचा शेतकऱ्यांचा वनवास संपला आहे असे आता नक्कीच म्हणता येईल. खरी समस्या मार्केटची होती. त्यावरही ‘ऑनलाईन लिलावा’चा पर्याय उभा राहत आहे. ही आशादायी बाब आहे. सह्याद्रीचा हा उपक्रम राज्यातील फळशेतीसाठीही पथदर्शी ठरणार आहे.’’

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :नाशिकद्राक्षेशेती