जळगाव : जिल्ह्यात उष्णतेची लाट (Temperature) पसरली असून, यामुळे केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. दरम्यान, अनेक शेतकरी या काळातही केळीची लागवड करत आहेत. केळीची लागवड करत असताना, केळीच्या रोपांचे (Banana crop) उष्णतेपासून संरक्षण व्हावे, यासाठी 'क्रॉप कव्हर'चा (Crop Cover) वापर केला जात आहे. क्रॉप कव्हरच्या वापरामुळे केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण होत आहे.
चांगल्या भावासाठी लागवड...
केळी लागवड पावसाळ्यात म्हणजेच जून-जुलैमध्ये केली जात होती. हा कालावधी योग्य मानला जात होता; पण आता ठिबक सिंचन व पुरेशा पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी फेब्रुवारी ते मार्च या काळात लागवड करू लागले आहेत. या बागेतून येणाऱ्या मालाला चांगला दर मिळत असतो, असा शेतक-यांचा अनुभव आहे.
क्रॉप कव्हर ६० टक्के उन्हाच्या झळा रोखते, पिकांचे होते चांगले संरक्षण
क्रॉप कव्हरच्या वापरामुळे केळीसह टरबूज, काकडी या पिकांच्या ६० टक्के उन्हाच्या झळा कमी होतात. यामुळे थोडा खर्च शेतकऱ्यांचा वाढत असतो. मात्र, पिकांचेही संरक्षण चांगल्या प्रकारे होते. जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान लक्षात घेता आता अनेक शेतकरी हे क्रॉप कव्हरचा वापर शेतीत करू लागले आहेत. या एका रोपासाठी क्रॉप कव्हरचा अंदाजे खर्च काढला तर पिशवी १ रुपये, काड्या आणि मजुरीसाठी दीड रुपये असा खर्च येतो.
४४ अंशांवर शेतात आग लागते..
केळी या पिकासाठी ४२ अंशांपेक्षा अधिकचे तापमान हे धोकादायक असते. ४२ अंशांपेक्षा अधिक तापमान गेले की, केळीच्या रोपांसह अनेकदा फळालाही धोका होत असतो. अशावेळेस केळीची लागवड करत असताना हा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून केळी लागवड करत असताना, क्रॉप कव्हरचा वापर केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात उन्हाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यात केळीसह कोणत्याही पिकाची लागवड मार्च ते मे या महिन्यांत केली तर उन्हामुळे पिकांचे नुकसान होतच असते. त्यामुळे केळीची लागवड करत असताना, उन्हापासून केळीच्या रोपांचे संरक्षण व्हावे, यासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला जातोय, यामुळे केळीच्या रोपांचे संरक्षण होत असते.
- अनिल सपकाळे, केळी उत्पादक शेतकरी, करंज