Join us

Bhondai Festival : आदिवासी संस्कृतीतील भोंडाई उत्सव कसा साजरा केला जातो? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 3:47 PM

Bhondai Festival : भोंडाईला नाचवून पुर्ण आदिवासी समाज जणू काही आनंदाची उधळणच करत असतो. भोंडाई काय असते?

Dasara Festival :  नवरात्र (Navratri Festival) सुरू झाली की आदिम संस्कृती जपण्यामध्ये स्त्रियांचं योगदान खुप मोलाचं आहे. त्यामध्ये आदिवासी संस्कृतीची जोपासना नित्यनेमाने अगदी वेगळ्या अंदाजात बघायला मिळते. तुम्ही म्हणत असाल की मी कशा विषयी बोलतोय..? मी बोलतोय 'भोंडाई' विषयी जी पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेली एक आदिम संस्कृती आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra Festival) त्या त्या भागानुसार साजरा केला जातो. जाणून घेऊया या भोंडाई (Bhondai Festival) उत्सवाबद्दल.... 

नागलीचा गोंडा, वरईचं लोंब, खुरासणीचे फुलं, भाताचे लोंब किंवा देव भाताचे लोंब असे इत्यादी धान्य गोळा करून तांब्यात मस्तपैकी सजवून जी आकृती तयार केली जाते, त्याला 'भोंडाई' म्हणतो. जेव्हा नवरात्र सुरू झाली की, तेव्हा पासून हा भोंडाईचा उत्सव सुरू होतो. आदिवासी महिला आदिवासी पेहरावात, तर लहानसहान मुली देखील अशाच पद्धतीने पेहराव करून गावोगावी फिरत असतात.ताला सुरात टिपऱ्या वाजवून दारोदारी भोंडाईचे गाणे गायले जाते. भोंडाईचे गाणे असंख्य आहेत. पण त्या आधी ती भोंडाई ज्या त्या घराच्या अंगणात ठेवावी लागते. 

कधी कधी काही माणसं अंगणात पाटीखाली झाकून एखादी वस्तू ठेवतात, त्यांना ओळखण्यासाठी. हा वस्तू ओळखण्याचा खेळ सुद्धा भोंडाईचाच एक भाग आहे. जर ती वस्तू त्यांनी ओळखली तर ती वस्तू त्यांची होते, म्हणजे त्यांना द्यावी लागते. हा नियम असतो, भोंडाई खेळाचा. त्याच्या बदल्यात त्यांना धान्य दिले जाते. काहीजण पैसे देतात तो भाग वेगळा, पण सहसा धान्यच देतात. एका दिवसात परिसरातील जेवढी गाव होतील, तेवढ्या गावोगावी त्यांची फेरी चालत राहते. सकाळपासून त्यांची निघालेली स्वारी बरेच गाव तुडवून घराकडे परतत असते.

आणि मग शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते धान्याचा स्वयंपाक करून त्यांच्या गावाला किंवा वाडीला जेवू घालतात. मग त्यात खिर असो नाहीतर मग मसाले भात असो. असे नाना तऱ्हेचे पदार्थ ते बनवत असतात. गावाला जेवणावळ खाऊ घालुन ते आनंद साजरा करत असतात. बरं ते एवढ्या वरच न थांबता अजून पुढे त्या भोंडाईला रात्रीच्या वेळेला याच्या त्याच्या हातात देऊन गाणं सांगुन आनंद साजरा जातं. ते गाणं भोंडाई नाचवण्याचच असतं. आणि मग भोंडाई नाचवल्यानंतर ते साधे गाणे सांगुन फेरा धरून नाचतात. त्यामध्ये स्त्रियाच सहभाग नोंदवत असतात, पुरुष नाही. भोंडाईला नाचवून पुर्ण आदिवासी समाज जणू काही आनंदाची उधळणच करत असतो. भोंडाई काय असते हे आपल्याला या गीतातून बघायला मिळते."बायाच्या दारी खेतरी आंबा घावका मोहरी आला, घावका मोहरी आला रे रामा..कोणाच्या रं कोण रं तुम्ही कुडं रं चालल्या कुडं रं चालल्या रे रामा.."

प्रकृतीच्या सानिध्यात राहून प्रकृतीलाच सन्मानानं आदर स्थान दिले जातं. शेतीला बरकत यावी आणि पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून जे शेतात पिकवलं जातं, त्याची पुजा केली जाते. निसर्गावर पुरेपुर विश्वास त्याला शेतीची भरभराट होण्याचं साकडं घातलं जातं. त्या मागची श्रद्धा निर्मळ नितळ स्वरुपाची असते. याचसाठी भोंडाई उत्सव साजरा केला जातो.विशेष म्हणजे ही परंपरा आजही शाबूत आहे. 

- माधव चिल्लु गांगड, इगतपुरी नाशिक 

टॅग्स :शेती क्षेत्रदसराशारदीय नवरात्रोत्सव २०२४