नाशिक : सन २०२५ चा द्राक्ष हंगाम (Grape Season) स्थिर आहे, एकाचवेळी मोठी आवक बाजारात येण्याजोगे उत्पादन झालेले नाही. मात्र, काही द्राक्ष निर्यातदारांकडून निर्यातक्षम द्राक्षाचे दर मर्यादित ठेवल्याचे चर्चेत आले आहे. द्राक्ष बागायतदारांनी (Draksh Market) व्यवहारासाठी घाई करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक अध्यक्ष विभागीय बाळासाहेब गडाख, सचिव बबनराव भालेराव यांनी केले आहे.
निफाड तालुक्यातील ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर बाळासाहेब गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. द्राक्ष हंगामाचा आढावा घेत असताना द्राक्ष निर्यातीच्या दरावर (Grape Export Market) ठराविक निर्यातदारांकडून नियंत्रण ठेवले जात असल्याचे चर्चेतून समोर आले आहे.
गतवर्षी १ नोव्हेंबर २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत युरोपीय देशांसाठी २४९६ कंटेनरद्वारे सुमारे ३२,३५५ मे. टन द्राक्षमाल निर्यात करण्यात आला आहे. एकूण ३४३७ कंटेनरमधून ४७,३६० मे. टन द्राक्षमाल निर्यात करण्यात आला होता. त्यावेळी निर्यातक्षम द्राक्षाला ७० ते १२५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. चालू द्राक्ष हंगामाचा विचार करता १ ऑक्टोबर २०२४ ते ६ फेब्रुवारी २०२५ पावेतो यूरोपीय देशांसाठी १२२७ कंटेनरद्वारे १६,२६० मे. टन निर्यात करण्यात आला २०४३ कंटेनरमधून २८,२९६ मे. टन निर्यात करण्यात आला.
पडताळणी करून व्यवहार
द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षमालाचा व्यवहार करण्यास घाई करू नये. द्राक्षाचे चालू हंगामातील उत्पादन हे गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. प्रत्यक्ष निर्यातदार व्यापारी यांच्याशी संपर्क करून द्राक्षाची पडताळणी करून व्यवहार करावा, असे आवाहन बागायतदार संघाचे कैलासराव भोसले, बाळासाहेब गडाख, बबनराव भालेराव विभागीय संचालक मंडळाने केले आहे.