Join us

'जे पेरलं ते उगवलंच नाही', जबाबदार कोण? 

By गोकुळ पवार | Published: December 11, 2023 1:08 PM

नाशिक जिल्ह्यात बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी खरीप हंगामातही अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी खरीप हंगामातही अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यात सोयाबीन बियाणांबाबतच्या तक्रारींचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना फसविल्याप्रकरणी जून ते नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र वाढत्या बोगस बियाणांच्या तक्रारीमुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

गेल्या काही वर्षांपासून बोगस बियाणांची मालिका दिवेसंदिवस समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी खरिपासाठी शेकडो क्विंटल बियाणे, खतांची आवश्यकता असते. पेरणीसाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी अगोदरपासूनच बियाणे, खताची जुळवाजुळव करतात. मात्र, अनेकवेळा बियाणांची उगवण होत नसल्याने पैसा तर जातोच, उलट पुन्हा बियाणे खरेदीसाठी धावपळ करावी लागते. खरीप हंगामातही सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तच्चल तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. यात एकाही कंपनी अथवा विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला नाही.

तर जबाबदार कोण?

बहुतांश वेळा बियाणेबोगस असल्यास पिकाची उगवण होत नाही. तर काही वेळा केवळ पिकाची वाढ होते. यात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.पेरणी करताना माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परीक्षण न करता बियाणांची लागवड केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान ओला अथवा कोरडा दुष्काळामुळे होत आहे. पेरणीनंतर अपेक्षित पाऊस झाल्यास बियाणे उगवण चांगली होण्याची शक्यता असते. अन्यथा नुकसानच होऊ शकते. तर शेतकरी बच्चू टेकवाडे म्हणाले की, मी स्वतः भाजीपाला व धान्य उत्पादक शेतकरी असून मागील वर्षी खरिपात बियाणांची उगवण योग्य न झाल्याने पीक आले नाही. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. उगवण क्षमता कमी असलेल्या बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.

बियाणे खरेदीवेळी अशी खबरदारी घ्या? 

मुख्यत्वे बियाणे खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या काय तपासावे, अशा अनेक बाबींचा समावेश असतो. यात, बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याची उगवणक्षमता, शुद्धता, चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या टॅगवर अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. या कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात, म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही.

टॅग्स :शेतीनाशिक