Join us

Leaf Curl of Chilly : मिरचीवर चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव, कसे कराल नियंत्रण, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 6:34 PM

Chilly Crop : जळगाव जिल्ह्यातील मिरची शेतीवर लिफ कर्ल अर्थात चुरडा-मुरडा या रोगाने आक्रमण केले आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) भुसावळ तालुक्यातील लोहारा परिसरातील मिरचीवर लिफ कर्ल (Leaf Curl) अर्थात चुरडा-मुरडा या रोगाने आक्रमण केले आहे. हा रोग विषाणूजन्य आहे. पांढरी माशी किंवा संक्रमित केळी याद्वारे हा रोग पसरतो. त्यामुळे लोहारा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या मिरचीचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीवर रोटाव्हेटर फिरवला आहे.

लोहारा आणि कळसमरा या भागात मागील काही वर्षांपासून मिरचीचे (Chilly Farming) उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी कमीअधिक प्रमाणात मिरचीवर विविध रोगांचे आक्रमण होत असते. मात्र यंदा या रोगांचे प्रमाण जास्तच आहे. सध्याचे ढगाळ वातावरण देखील रोगराईला पोषक असल्याचे चित्र आहे. 

काय असतात लक्षणे 

चुरडा-मुरडा या रोगात पानांच्या कडा वरच्या दिशेने मुडपतात, त्याच्या शिरा पिवळ्या पडतात. पानांचा आकार कमी होतो. जुनी पाने खरबडीत आणि जाड होतात. झाडांची वाढ खुंटते. फळांचे गुच्छ लहान आकाराचे होतात. संवेदनशील वाणातील फळे अविकसित होतात. या विषाणूची लक्षणे फुलकिडे आणि कोळीच्या प्रादुर्भावासारखीच असतात. यात संक्रमित रोपे काढून टाकणे, हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले जाते.

मिरचीचे क्षेत्र मोठे आहे. त्यातून पिकाचा फेरपालट होत नाही. जमिनीत बुरशी मोठ्या प्रमाणात आहेत, सध्या ढगाळ वातावरण पोषक असल्याने मिरची पीक हे लिफ कर्लला व्हायरसला बळी पडले, शेतकऱ्यांनी पिकाचा फेरबदल करणे काळाची गरज आहे, जमिनीची मशागत चांगली करूनच जमीन चांगली तापवून बुरशीनाशक जमिनीत टाकायला हवी, काढलेले पीक शेतातल्या शेतात न टाकता त्याची विल्हेवाट योग्य त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावावी.-आर. एस. जोहरे, कृषी सहायक, लोहारा-कळमसरा

चुरडा-मुरडा या रोगामुळे मिरचीचे मोठे नुकसान होत आहे. त्यात योग्यवेळी फवारणी करणे हा उपाय आहे. आता मात्र तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असल्याने संक्रमित पिके काढून टाकायला हवी. त्याचा प्रसार पांढरी माशीमुळेदेखील होतो. सध्याचे वातावरणदेखील या रोगांच्या प्रादुर्भावासाठी पोषक आहे. - हेमंत बाहेती, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद

लाखो रुपयांचे नुकसान 

शेतकरी सुनील जाधव म्हणाले की, मे महिन्याच्या शेवटी यंदा एक एकर क्षेत्रामध्ये मिरची लागवड केली होती, दरवर्षी व्हायरस येतो, यंदा प्रमाण जास्त असल्याने उत्पन्नात मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने लागवडीपूर्वी खेड्यापाड्यात याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. तर स्वप्निल क्षीरसागर म्हणाले  की, फुलांच्या बहरात मिरची यायला सुरुवात झाली होती. त्याचवेळी हा व्हायरस आला. अनेक प्रयत्न केले. शेवटी रोटाव्हेटर फिरवावा लागला. मे महिन्यात २५ हजार रोपांची लागवड केली होती. यात किमान एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :मिरचीजळगावशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन