Kanda Bajarabhav : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरात (Kanda Market Down) सातत्याने घसरण सुरूच आहे. जवळपास डिसेंबरच्या शेवटी कांद्याचे दर हे जवळपास साडेतीन ते पावणे चार हजार रुपयांपर्यंत होते, मात्र आजच्या घडीला कांदा हा थेट दोन हजार रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे.
त्यातच आज विधिमंडळात अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याबाबत काही निर्णय राज्य सरकार घेईल का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
एकीकडे लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) आवक वाढत असून दुसरीकडे आता हळूहळू उन्हाळा कांदा देखील बाजारात येऊ लागला आहे. आणि यामुळे लाल कांद्याच्या दरात जी घसरण सुरू आहे. त्याचा फटका देखील उन्हाळा कांद्याला बसत असल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचं शेतकऱ्यांचा आरोप आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक झपाट्याने वाढत असल्याने बाजारात कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्याचं शेतकरी संघटनांचे म्हणणं आहे. त्यामुळे सरकारनं तातडीने कांद्यावर लावलेले 20 टक्के निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच आज राज्य सरकारच्या विधिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या माध्यमातून कांद्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय होईल का, हे पाहावं लागणार आहे.