Join us

Loksabha Election Result : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा ठरला जायंट किलर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 4:27 PM

Nashik Loksabha Election Result 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष मतपेट्यांमधून दिसून आला. 

Loksabha Election Result : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) निकाल जाहीर होत आहेत. यात महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या असलेल्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचा पराभव निश्चित मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील कांदा प्रश्न (Onion Issue)  चांगलाच पेटला होता. मात्र याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर अखेर लोकसभा निवडणुकांत शेतकऱ्यांनी आपला रोष मतांद्वारे देत चांगलाच डंका दिला आहे. 

मुळातच नाशिक (Nashik District) जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. लाखो शेतकरी कांद्याचे (Onion farmers) उत्पादन घेत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्यावरून राजकारण सुरु असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले. सुरवातीला डिसेंबरमध्ये केलेली निर्यात बंदी, त्यानंतर शेतकऱ्यांचा झालेला आक्रोश... नंतरच्या काळात शेतकऱ्यांनी कांदा प्रश्न उचलून धरत आंदोलने, निवेदने सादर केली. मात्र नाशिक आणि दिंडोरी लोकसभा (dindori Loksabha) मतदारसंघातून दोन्ही उमेदवार सत्ताधारी पक्षातील असताना देखील हा प्रश्न सुटू शकला नाही. 

दरम्यानच्या काळात दोन्ही खासदारांप्रती शेतकऱ्यांचा रोष दिसून येत होता. अखेर निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने निर्यात खुली केली मात्र निर्यात शुल्क तेच असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. शिवाय या मतदारसंघात शेतकऱ्यांची संख्या मोठी असून इतिहासात प्रथमच शेतकरी शेती प्रश्नावर एकत्र आल्याचे दिसून आले. कांदा प्रश्नावरील रोष शेवटपर्यंत प्रचारामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी होता. म्हणूनच मतदानाच्या दिवशी देखील शेतकऱ्यांनी कांदा-टॉमेटोच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्राजवळ रोष व्यक्त केला. परिणामी शेतकऱ्यांचा रोष आज निकालाच्या दिवशी मतपेट्यांमधून दिसून आला. 

शेतकरी व शेती विरोधी भाजपा सरकारच्या धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी मतपेटी द्वारे विरोध केलेला आहे. कारण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेत नाही. खास करून अचानक कांद्याची निर्यात बंदी करणे, निर्यात शुल्क वाढवणे. या सर्व गोष्टींचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला पराभव पत्करावा लागलेला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वचक बसल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद कोणत्याही सरकारला भविष्यात घ्यावी लागेल. 

- संजय साठे, कांदा उत्पादक शेतकरी 

ग्रामीण जीवनाचा केंद्रबिंदु म्हणुन शेतकरी राजाचा उल्लेख होतो मात्र शेती अन शेतकरी यांच्या अडचणी समस्या सोडविल्या गेल्या नाही की त्यांचा रोष मतदानातुन व्यक्त होतो. असाच लोकसभा नाशिक व दिंडोरी या शेतकरीबाहुल मतदारसंघाचा कौल समोर आला आहे. कांदा निर्यातबंदी , कांदा निर्यातमुल्य तसेच द्राक्षमालावर  बांगलादेशाने वाढविलेले आयात शुल्क याबाबत वेळोवेळी शासनाकडे  शेतकर्यांनी पाठपुरावा करुनही फारसा गांभिर्याने विचार केला गेला नाही, त्याची परिनीती शेतकर्यांच्या नाराजीत झाली आहे. ही नाराजी कृषीप्रधान देशाच्या राज्यकर्त्यांना चिंतन करायला लावणारी आहे. मात्र नविन सरकारने शेतीविषयक धोरणांमध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेणेसाठी नाशिक दिंडोरीचा निकाल हा माईलस्टोन ठरावा.    - अँड रामनाथ शिंदे, संचालक - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासूनची कांदा निर्यातबंदी, सोयाबीनला अपेक्षित नसेलला बाजारभाव तसेच इतर पिकांबाबतही सरकारची उदासीनता यामुळेच भाजपला यंदाच्या निवडणुकांत पराभव पत्करावा लागत आहे. नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे, या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहोत, या बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीची कारवाई केली आहे. या प्रश्नाबाबत सर्वच सत्ताधारी मूक गिळून आहेत, म्हणूनच या शेतकऱ्यांनी देखील मतपेटीच्या माध्यमातून सरकारला इशारा दिला आहे. 

- भगवान बोऱ्हाडे, अध्यक्ष, शेतकरी संघटना समन्वय समिती 

केंद्रातील सरकारने कांदा निर्यातबंदी करुन ठरवून कांद्याचे भाव पाडले सोबतच दुध, सोयाबीन, कापसाला कवडीमोल दर मिळत असल्याने थेट आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार बद्दल तीव्र संतापाची लाट होती. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे होते, म्हणूनच त्यावेळी महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा त्यांना मिळाल्या होत्या. परंतु मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीसह अनेक शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे आता शेतकरी याचे उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून देतील असे आम्ही वारंवार सांगत होतो. परंतु भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतपेटीतून आपला रोष व्यक्त केल्याचे स्पष्ट होत आहे. 

- भारत दिघोळे, अध्यक्ष -महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना.

टॅग्स :नाशिककांदालोकसभा निवडणूक २०२४ निकाललोकसभा निवडणूक २०२४दिंडोरी