Join us

Pik Vima Yojana : उद्यापासून 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 4:47 PM

Pik Vima Yojana : या 6 जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

Pik Vima Yojana : उद्यापासून म्हणजेच 10 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे. तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती आहे. 

खरीप २०२३ हंगामात (Kharif Season) राज्यात एकूण साधारण ७६२१ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा (Pik Vima Yojana) हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110 टक्के पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप 2023 हंगामातील मंजूर ७६२१ कोटी पैकी विमा कंपनी मार्फत रुपये ५४६९ कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी पैकी रु.१९२७ कोटी ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होते. सर्वात जास्त पीकविमा नुकसानभरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दि. 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान त्याच 30 सप्टेंबरचे रात्री 11:30 वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगरसह 6 जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे १९२७.५२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा GR निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. 

उद्यापासून पैसे खात्यावर जमा होण्यास सुरवात 

सदर प्रलंबित नुकसान भरपाईमध्ये नाशिक रु.६५६ कोटी रुपये, जळगाव ४७० कोटी रुपये, अहमदनगर ७१३ कोटी रुपये, सोलापूर २.६६ कोटी रुपये, सातारा २७.७३ कोटी रुपये व चंद्रपूर ५८.९० कोटी रुपये प्रलंबित होते. सदरची प्रलंबित रक्कम रुपये १९२७  कोटी मंजूर केली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. १० ऑक्टोंबर नंतर शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करण्यास सुरू करण्यात येईल अशी माहिती अहमदनगर कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीपीक कर्ज