Join us

Pulse Seed : जळगाव जिल्ह्यात कडधान्य बियाण्यांची खरेदी का वाढली? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:42 PM

Agriculture News : तूर, मूग आणि उडदाची यंदा गतवर्षीच्या तुलनेत चांगल्यापैकी पेरणी (Sowing) झाल्याचे दिसून येत आहे.

Agriculture News :जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) यंदा मान्सूनचे वेळेवर आणि दोन दिवसांपूर्वी दमदार आगमन झाल्यामुळे खरीप हंगाम जोमात आहे. डाळीचे भाव वाढल्यामुळे कडधान्यांच्या लागवडीसाठी बियाणांची (Pulse Seed) शेतकऱ्यांकडून दुपटीने खरेदी वाढली असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. बियाणांची मागणी, पुरवठा आणि विक्रीच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.

तूर, मूग आणि उडदाची यंदा गतवर्षीच्या तुलनेत चांगल्यापैकी पेरणी (Sowing) झाल्याचे दिसून येत आहे. तूर लागवडीत बोदवड, मुक्ताईनगर, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा व जामनेर तालुक्याने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. बोदवड तालुक्यात ६६ टक्के, तर मुक्ताईनगरमध्ये ५६ टक्के लागवड झाली आहे. अन्य तीन तालुक्यांत १३ ते ३९ टक्के इतकी तूर लागवड झाली आहे. मूग पेरणीतही बोदवडच (७४.१४ टक्के) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव (२४.६८), भडगाव (२२.५८) व अमळनेर (१७.६७) आघाडीवर आहेत. उडीद पिकामध्ये या तालुक्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून कडधान्यांची पेरणी केली आहे.

कडधान्यांच्या बियाणे विक्रीचा तपशील

कडधान्यांच्या बियाणे विक्रीचा तपशील पाहिला असता तुर जवळपास 11560 हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे, तर 1270 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. तर मूग 14,500 हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. तर 980 क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. उडीद 14000 हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे तर 1420 बियाण्यांची विक्री झाली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण तीन हजार 670 क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. 

कडधान्य लागवडीचे फायदेकृषी दृष्टिकोनातून, कडधान्यांची शेती जमिनीतील वातावरणातील नायट्रोजन निश्चित करण्याच्या क्षमतेसाठी आणि पशुधनासाठी पर्यायी प्रथिने स्त्रोत म्हणून काम करण्यासाठी अनेक फायदे आहेत. कडधान्य पिकांची पाण्याची गरज ही इतर पिकांपेक्षा अतिशय कमी असते. कमी पाण्यात ही पिके चांगले उत्पादन देतात. त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रात लागवडीसाठी ही पिके अतिशय उपयुक्त आहेत. कडधान्य पिके ही विविध प्रकारच्या हवामान परिस्थितीत तग धरण्यास सक्षम असतात.

जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद म्हणाले.... 

यंदा यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत बोदवड (१९.३), अमळनेर (५.९३), पारोळा (२१.१९) व चाळीसगाव (५.८२) याच तालुक्यांत भुईमुगाची लागवड केल्याचे दिसून येत आहे. अन्य तालुक्यात इंचभर जागेतही भुईमुगाची लागवड झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद म्हणाले कि, कडधान्ये पिके हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून आपली नत्राची गरज भागवतात, जमिनीत उपलब्ध नत्राचे प्रमाण वाढवायला मदत होते. शेतकऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिल्याचा आनंद आहे.  

टॅग्स :शेतीजळगावशेती क्षेत्रतुरापेरणी