Join us

Apple Farming : हिमाचलमधून आणली रोपे, भात शेतीला पर्याय म्हणून 'अ‍ॅपल' शेतीचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:39 IST

Apple Farming : भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) सिरसोली येथील शेतकऱ्याने भात पिकाला पर्याय 'अ‍ॅपल' शेतीचा (Apple Farming) प्रयोग केला आहे.

- राजू बांते  

भंडारा : भाताची शेती (Paddy Farming) परवडत नाही. उत्पादनानुसार भावही मिळत नाही, अशी ओरड बहुतांश शेतकऱ्यांची आहे. परंपरागत शेतीशिवाय वेगळं काही करण्याची शेतकऱ्यांची हिंमत होत नाही. परंतु, भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) सिरसोली येथील एका शेतकऱ्याने चक्क जिल्ह्यात पहिल्यांदाच 'अ‍ॅपल' शेतीचा (Apple Farming) पहिला प्रयोग केला आहे.

भंडारा जिल्हा भात पिकाच्या (Bhat Sheti) उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आधुनिक शेती करण्यास बोटावर मोजण्याएवढे शेतकरी जिल्ह्यात दिसतात. मात्र, शेतीमध्ये वेगळं काही करण्याचे धाडस सिरसोली येथील बाबू कस्तुरे या शेतकऱ्याने केले आहे. कस्तुरे यांच्या डोक्यात शेती करण्याबाबत वेगवेगळे विचार येत असतात. जिल्ह्यात होत नाही ते आपण केले पाहिजे, अशी धारणा त्यांनी केली.

हिमाचलमधून आणली अ‍ॅपलची ४०० रोपे२०२१ ला त्यांनी दोन एकरात अ‍ॅपल शेतीचा पहिला प्रयोग केला. अ‍ॅपल फळाच्या शेतीला हवामान थंड असावा लागतो. यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेश येथे जाऊन हिरामण शर्मा यांची अ‍ॅपलची नर्सरी पाहिली. तिथे जाऊन व्यापारी शेतीविषयीची माहिती घेतली. शर्मा यांनी एचआरएम या अ‍ॅपल या जातीची उत्क्रांती केली. विदर्भासारख्या ४५ ते ४८ सेल्सियस तापमानात हे अ‍ॅपल तयार होऊ शकतात. कस्तुरे यांनी हिमाचल प्रदेशमधून अ‍ॅपलची ४०० रोपे आणले.

रानडुकरांनी केली २०० झाडे जमीनदोस्तकस्तुरे यांनी ४०० अ‍ॅपल झाडांची लागवड केली. मात्र रानडुकरांनी २०० झाडे जमीनदोस्त केली. आता त्यांच्या शेतात १७५ अ‍ॅपलची झाडे उभी आहेत. पहिल्याच वर्षी त्या अ‍ॅपलच्या झाडांना फुलोरा व फळे आले होते. परंतु ते पहिले फळ तोडावे लागले होते. आजघडीला त्यांच्या शेतात असलेल्या अ‍ॅपलच्या झाडांना फुलोरा आला आहे. तसेच काही झाडांना अ‍ॅपल लागलेली आहेत. बाबू कस्तुरे या प्रगत शेतकऱ्यांनी अ‍ॅपलच्या शेतीशिवाय चार एकरात मिरचीचे पीक घेतले आहे. तर दहा-बारा एकरात भाताची शेती लावली होती.

कृषी योजनांचा लाभ घेण्यास पाहतात मागेपुढेराज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातुन फलोत्पादन व बागायत शेतीसाठी विविध योजना आणल्या आहेत. मार्गदर्शनाचा अभाव म्हणावा की जनजागृतीची कमी यामुळे अनेक शेतकरी योजनांचा लाभ घेण्यास मागेपुढे पाहतात. सबसीडी व विविध लाभही या शेतीतुन मिळु शकते. नगदी पीक हातात येत असल्याने त्यातुनही लाखोंची कमाई करता येते. मात्र यासाठी ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे. तेव्हाच कृषी योजनांचा लाभ घेता येईल.

शेतकऱ्यांनी भात शेतीशिवाय इतरही नगदी पिकांची शेती करावी. अ‍ॅपलच्या शेतीला कृषी विभागाने मार्गदर्शन व मदत करावी. अनुदानही देण्यात यावे.- बाबू कस्तुरे, शेतकरी, सिरसोली

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी यशोगाथाभंडारा