भंडारा : शेतीसंबंधातविजेची समस्या (Power Supply) ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या आहे. अनेक ग्रामीण भागात रात्री-अपरात्री वीजपुरवठा सुरू होत असतो. त्यामुळे रात्रभर शेतकरी पिकाला पाणी देत असतो. त्यामुळे या परिस्थितीमध्ये अनेक जीवघेणे प्रकार शेतकऱ्यांसोबत घडले आहेत.
बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर सोलर कृषी पंप (Krushi Saur Pump Yojana) घेतले आहेत; पण सोलर पंपाला पाण्याचा प्रेशर येत नसल्यामुळे शेतकऱ्याची वेगळीच डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी, वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनाकडून कृषी सौर पंप योजना (Solar Pump Yojana) सुरू करण्यात आली; मात्र सौर पंप जोडल्यानंतरही पाहिजे तेवढे अपेक्षित पंपाला प्रेशर मिळत नसल्याने पिकांच्या वाढीसाठी अडथळे निर्माण होऊन उत्पन्नावर परिणाम होत आहे.
सिंचनासंबंधी अडचणी
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनाकडून सबसिडीमध्ये १ सोलर पंप पुरविण्यात आले; परंतु सोलर पंप व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सिंचनासंबंधी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यासंबंधित तक्रारी केल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या पंपाच्या तुलनेत या सौर पंपाला पाण्याचा प्रेशर मिळत नाही. त्यामुळे शेतीसाठी, पिकाच्या लागवडीसाठी, शेती ओलितासाठी फार जास्त विलंब लागत असल्याने सौर पंप असून फायदा काय? असा सवाल शेतकऱ्यांना उपस्थित होत आहे.
ढगाळ वातावरणामध्ये मिळते प्रेशर झिरो
कृषी सौर पंप हा फक्त उन्हाळ्या पुरताच मर्यादित आहे? असे स्पष्ट होत आहे. कारण बाकीच्या ऋतूंमध्ये सौर पंप चालविताना जर का थोडेही ढगाळ वातावरण आले की, सौर पंपाचा प्रेशर कमी होत असतो. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला वेळेवर पाणी मिळत नसल्याने पाहिजे तेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फसल होत नाही.
अर्ज करूनही पंप मिळेना
कृषी सौर पंपासाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज करतात; मात्र एक-दीड वर्षापासून प्रतीक्षा केल्यानंतरही शेतकऱ्यांना पंप मिळत नाही. शेतकरी नेहमी नेहमी कृषी सौर पंप कार्यालय गाठतात; मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देऊन त्यांची वेळ मारून नेली जाते. वीजपुरवठा तर नाहीच; पण जर का सौर पंपही मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय करावी तरी कशी करावी, असा प्रश्न आता अनेकांकडून विचारला जात आहे.