Join us

Agriculture News : युरियासोबत लिक्विड घेण्यासाठी जबरदस्ती, किंमतही अधिक, नाशिक जिल्ह्यातील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 3:42 PM

Agriculture News : युरिया खत 266 रुपयांना असताना शेतकऱ्यांकडून 300 रुपये वसूल केले जात आहेत.

Nashik : एकीकडे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी शेतकरी बाजारात जाऊन खत खरेदी करत आहेत. या शेतकरी युरिया (Urea) मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. मात्र सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचा दर खत विक्रेते घेत असल्या समोर आले आहे. शिवाय खताबरोबर लिक्विड घेण्याची जबरदस्ती देखील या  खत विक्रेत्यांकडून (Krushi Seva Kendra) केली जात असल्याचं बाब समोर आले आहे.

शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या (Kharif) तयारीची लगबग सुरू आहे. यात बी बियाण्यांच्या खरेदीसह खतांची खरेदी करत असतात. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. लवकरच भात लागवडीला सुरुवात होणार असल्याने शेतकरी खत खरेदीच्या धावपळीत आहेत. मात्र अशातच सर्वाधिक वापरला जाणाऱ्या युरियाचा तुटवडा परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी माघारी फिरत आहेत. दुसरीकडे एखाद्या कृषी सेवा केंद्रात युरियाची गोण मिळाल्यानंतर सोबत दुसऱ्या खताची मात्रा देखील घेणे आवश्यक असल्याचे कृषी सेवा केंद्राकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरज नसताना दुसऱ्या खताची मात्रा देखील खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे कृषी विभाग म्हणतंय की जिल्ह्यात खताचा तुटवडा नाही मग आताच युरिया खतासाठी खत विक्रेते शेतकऱ्यांना नाही म्हणून सांगत आहेत. काही ठिकाणी युरिया उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यास दुसरे जड खत घेण्यास भाग पाडले जात आहे. शिवाय युरिया खतासोबत लिक्विड घेण्यासाठी देखील शेतकऱ्यांना जबरदस्ती केली जात आहे. सरकारने युरिया गोणीची किंमत 266 रुपये अशी ठेवली असताना खत विक्रेते सर्रासपणे 300 रुपये घेत आहेत. तसेच युरिया खताबरोबर 200 ते 250 रुपयांना असणारे लिक्विड देखील दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना एकाच युरिया गोणीची आवश्यकता असताना त्यातही लिक्विड खत माथी मारले जात आहे. 

लिक्विड घेण्यासाठी जबरदस्ती 

दरम्यान नाशिक तालुक्यातील गिरणारे भागात असलेल्या कृषी सेवा केंद्रावर हा प्रकार घडत आहे. या भागात असंख्य टोमॅटो, द्राक्ष, भात उत्पादक शेतकरी आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश शेतकरी या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने याच ठिकाणी बी बियाण्यांसह खत खरेदी करत असतात. मात्र अशा पद्धतीने येथील शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. एकीकडे शासनाने याबाबत भरारी पथके तयार केली असून या खत विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कृषी अधिकारी काय म्हणाले? 

याबाबत नाशिक तालुका कृषी अधिकारी भटू पाटिल म्हणाले की, असला प्रकार कुठेही घडत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे, कृषी विभागाने यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केले असून संबंधित क्रमांकावर देखील शेतकऱ्यांनी तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. खत विक्रेत्यांना खतासाठी अधिकचे पैसे देऊ नका, थेट नावासाहित तक्रार करा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

टॅग्स :नाशिकशेती क्षेत्रशेतीखते