Join us

Crop Insurance : 'या' पाच गोष्टीमुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळतो, अन्यथा....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 4:01 PM

Crop Insurance : पीकविमा काढल्यानंतर कोणत्या बाबीमुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

Crop Insurance : मागील वर्षांपासून राज्य सरकारच्या माध्यमातून एक रुपयात पीकविमा (Fasal Vima yojna) ही योजना सुरु करण्यात आली आहे. केवळ रुपया शुल्क आकारून पीकविमा काढला जातो. हा पीकविमा काढल्यानंतर कोणत्या बाबीमुळे शेतकऱ्यांना पीकविमा (Pik Vima) मिळतो, हे पाहणे महत्वाचे आहे. पुढील कारणामुळे म्हणजेच शेतकऱ्यांस टाळता न येण्या जोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळते, ते पाहुयात... 

प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे 

हंगामातील अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी / लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी / लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान 

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील.

पिक पेरणीपासून काढणीपर्यंत पिकांच्या उत्पादनात येणारी घट  

दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, किड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पादनात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती :  (Localized Calamities) या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येईल.

काढणी पश्चात नुकसान : (Post Harvest Losses)

ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

सर्वसाधारण अपवादतर वरील सर्व विमा संरक्षणाच्या बाबी युद्ध आणि अनुविधाचे दुष्परिणाम हेतू पुरस्कर केलेल्या  टाळद्याने जो धोक्यात लागू असणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत विमा संरक्षण मिळणार नाही.

टॅग्स :शेतीपीक विमापीक कर्जशेती क्षेत्र