Join us

ठाणे जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर हरभरा फुलला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 4:24 PM

वाल, चवळीच्या शेंगेलाही तरतरी, बळीराजा सुखावला, रब्बीचे पीक डोलू लागले

ठाणे : जिल्ह्यामध्ये सध्या गुलाबी थंडी जोरात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या रब्बी हंगामाचे पीक डोलायला लागले आहे. यंदाच्या रब्बी पिकांमध्ये हरभऱ्यासह वाल, चवळी, मूग आदी पिके तब्बल पाच हजार ७५० हेक्टरवर तेजीत असल्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे.

जिल्ह्यात भात हे एकमेव खरिपाचे पीक आहे. मात्र, रब्बी पिकासाठी शेतकरी थंडीच्या आधी पूर्ण तयारीनिशी कामाला लागतो. त्याच्या या श्रमाचे चीज लक्षात घेता सध्याच्या थंडीत या पिकाचा सुखद अनुभव शेतकऱ्यांना घेता येत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले सध्या कमी प्रमाणात वाहत आहेत. पण पडणाऱ्या थंडीचा गारवा आणि धुक्यामधील दवबिंदू या रब्बी हंगामासाठी हितावह ठरत आहे.

पहाटेच्या वेळी जिल्ह्यातील माळरानावर, घाट परिसरात धुक्याची दाट चादर दिसून येते. रब्बी पिकांसाठी उत्तम हवामान असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त क्षेत्रावर रब्बी हंगाम हाताशी आला आहे. सध्या पाच हजार १०५ हेक्टरवर पेरा घेतल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

• या रब्बी हंगामात हेक्टरी ६७४ क्विंटल हरभऱ्याची उत्पादकता निश्चित केली आहे. त्यासाठी तीन हजार ४३२ हेक्टरवर शेतकऱ्यांकडून हरभरा पेरण्यात आला आहे. मूग २२० हेक्टरवर घेतला असून ६८२ क्चिटल उत्पादकता निश्चित झाली आहे.

• एक हजार १२ हेक्टरवर वाल लावला आहे. वालाचे हेक्टरी ६०५ क्विंटल उत्पादन घेण्याचे निश्चित झाले आहे. चवळीचे पीक ७१५ हेक्टरवर घेतले आहे. त्याची उत्पादकता हेक्टरी ६४९ क्चिटल निश्चित केली आहे.

• उडीद २०१ हेक्टरवर घेतला जात असून ३१९ क्चिटल उत्पादकता निश्चित केली असून रब्बी मका या पिकाचे उत्पादन ११३ हेक्टरवर घेतले जात असल्याचे कृषी विभागाच्या आढाव्यावरून उघड झाले आहे. निसगनि कृपा केली तर हाताशी आलेले पिक वाया जाणार नाही, अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यानी व्यक्त्त केली आहे.

इतक्या हेक्टरमध्ये घेतली ही पिके

  • वाल - ६०५
  • चवळी - ७१५
  • उडीद - २०१
  • मका - ११३
  • मूग -  २२०
  • हभरा - ६७४ 
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्ड