Join us

बीज जागृतीसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून सिड काँग्रेसचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 9:35 PM

शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमापुंजी पूर्णपणे शेतात न लावता त्यातील काही रक्कम राखीव ठेवावी जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर तेव्हा ही रक्कम उपयोगी येईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सिड काँग्रेस 2023 च्या अनुषंगाने फळ बाग संशोधन केंद्र हिमायतबाग छत्रपती संभाजीनगर येथे आज पत्रकार परिषद घेतली. बीज उत्पादने आणि लागवडीयोग्य बीज उत्पादित करण्यासाठी येणाऱ्या काळातील आव्हाने शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयावर कुलगुरूंनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमापुंजी पूर्णपणे शेतात न लावता त्यातील काही रक्कम राखीव ठेवावी जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर तेव्हा ही रक्कम उपयोगी येईल. शेती, विज्ञान व तंत्रज्ञान, सरकार, कृषी औद्योगिक संस्था यांना एकत्रित आणून भविष्यात शेतीच्या प्रत्येक कोपऱ्यातून शेतकऱ्याला दोन पैसे मिळावेत यासाठी आधी बीज मजबूत संशोधित व शेतकऱ्यांना परवडणारे असावे यासाठी या सिड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते.

शेती नियोजनामध्ये जमीन, हवामान, बियाणे, पेरणी, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, पीक काढणी, मळणी, साठवण व विक्री हे महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे बियाणे, बियाणे ही अधिक उत्पादन व उत्पादकतेसाठी मुलभूत निविष्ठा आहे. कृषि उत्पादन वाढविण्यात शुद्ध व दर्जेदार बियाण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. कारण बियाणे शुद्ध व दर्जेदार असल्याशिवाय इतर बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेसा मोबदला मिळत नाही.

आज आपल्या समोर बियाण्याशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, यामध्ये शुद्ध व दर्जेदार बियाणे निर्मिती व उपलब्धता, बियाणे बदल दर, बियाणे प्रक्रिया व साठवण पद्धती व व्यवस्था, बियाणे उद्योगातील प्रश्न व त्यांचे इतर राज्यात होणारे स्थलांतर, बियाणे संदर्भातील कायदे व नियमन इत्यादी बाबी महत्वाच्या असून त्यावर सखोल चर्चा करणे व पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे. बिजोत्पादक, बियाणे उद्योजक आणि सामान्य शेतकरी यांच्या दृष्टीने बियाणे व उपलब्धता यावर विचार करण्याची गरज आहे. आज तंत्रज्ञान फार पुढे गेले आहे त्याचा शुद्ध व दर्जेदार बियाणे उत्पादन, प्रक्रिया व साठवणूक, हाताळणी आणि पुढे सुयोग्य वापर व उत्पादन वाढ यासाठी संशोधन संस्था, बियाणे महामंडळ, बिजोत्पादन संस्था, उत्पादक, बियाणे उद्योजक यांच्यात योग्य समन्वय, चर्चा व एक निश्चित धोरण ठरवणे ही काळाची गरज आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेवून भारतीय कृषि अनुसंधानपरिषद, नवी दिल्ली, राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसीआणि देशातील कृषि विद्यापीठे यासाठी कार्यरत आहेत. यादृष्टीने ही राष्ट्रीय बियाणे परिषद अत्यंत महत्वाची व दिशादर्शक ठरणार आहे.

या १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेसाठी देशभरातील कृषि संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे उद्योजक, बिजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदरील राष्ट्रीय बियाणे परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा.डॉ. मंगला राय, माजी सचिव, कृषि संशोधन व शिक्षण विभाग, भारत सरकार व महासंचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे हस्ते होणार असून यासाठी पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई एस. पोपरे, बियाणे संवर्धन शेतकरी, अहमदनगर, डॉ. पी. के. सिंग, कृषी आयुक्त, भारत सरकार, नवी दिल्ली, पद्मश्री श्री कंवल सिंह चौहान, प्रगतीशील शेतकरी, सोनीपत, हरियाणा, डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष, कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्ली, श्री. अजय राणा, अध्यक्ष, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्ली, डॉ. एस. ए. पाटील, माजी संचालक, भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली, श्री. राजूबारवाले, अध्यक्ष, महिको ग्रुप, मुंबई, डॉ. इन्द्र मणि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी, डॉ. एच.एस. गुप्ता, अध्यक्ष, एएसी & अध्यक्ष, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था, डॉ. दत्तप्रसादवासकर, संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी हे उपस्थित आहेत.

अशाप्रकारे या परिषदेसाठी माजी सचिव, कृषि संशोधन व शिक्षण विभाग, 'भारत सरकार व महासंचालक, भाकृअप, नवी दिल्ली, पद्मभूषण शास्त्रज्ञ, पदाश्री शेतकरी, विविध विद्यापीठांचे आजी व माजी कुलगुरू, नामांकित शास्त्रज्ञ, बियाणे उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीविद्यापीठ