नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनची (National Natural Farming Mission) लातूर जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी केली जात आहे. नैसर्गिक शेती उपलब्ध संसाधनावर आधारित आहे.
'राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन' ही योजना आत्मा कृषी विभाग लातूर यांच्यामार्फत सन २०२४-२०२५ पासून राबविण्यात येत आहे.
एक गट ५० हेक्टरचा असून एकूण ५० गटांतर्गत जिल्ह्यात २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील ५० बचत गटांनी पुढकार घेतला आहे.
सेंद्रिय शेती कार्यक्रमांतर्गत शासनाकडून सेंद्रिय शेती (Organic farming) पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येते.
गटांमधील शेतकऱ्यांनी समन्वयाने राबविलेल्या कार्यक्रमाच्या नोंदी ठेवून सर्व माहिती संकेतस्थळावर भरण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते.
सेंद्रिय शेतीच्या धरतीवर सन २०२४-२०२५ या वर्षामध्ये 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन' राबविण्यात येत आहे.
नैसर्गिक शेती म्हणजे काय?
* नैसर्गिक शेती ही रासायनिक विरहित पारंपरिक शेती पद्धत आहे.
* या शेती पद्धतीत निसर्गाचे नियम कृषी पद्धतींना लागू केले जातात.
या योजनेची वैशिष्ट्ये
* ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते.
* या योजनेतून शेतकऱ्यांना बाह्य खरेदी केलेल्या निविष्ठांपासून मुक्त होण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते.
* या योजनेतून देशी गाय आणि स्थानिक संसाधनांवर आधारित एकात्मिक कृषी- पशुपालन मॉडेल लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
* या योजनेतून सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी प्रयत्न केले जातात.
हे ही वाचा सविस्तर : Organic farming : मेळघाटातील शेतीला जैविक कुंपणाचे संरक्षण वाचा सविस्तर