Join us

Natural Farming : धरा सेंद्रिय शेतीची कास; विषमुक्त धान्याला मिळतोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 5:36 PM

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सुरू करण्यात आले आहे. यात शेतकरी सहभागी होत आहेत. (Natural Farming)

Natural Farming :

चंद्रमुनी बलखंडे / हिंगोली :

रासायनिक खताच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असून, रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहेत. याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीस चालना दिली जात आहे.

जिल्ह्यातही तब्बल ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात आहे. यातून १ हजार ८२५ शेतकरी विषमुक्त धान्य पिकवत आहेत. शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशकांचा वापर केला जात आहे.

तसेच पाण्याचा अति वापर, जमिनीची धूप, एकच पीक वारंवार घेणे आदी कारणांमुळे जमिनीचा पोत बिघडून पिकांची उत्पादकता कमी होत आहे.यातूनच मशागतीचा खर्चही वाढत असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानव व पशुपक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळेच अनेकांचा कल सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या अन्नधान्य खरेदी करण्याकडे वाढला आहे.

शासनानेही नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन सुरू केले आहे.या मिशनला चांगला प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यात जवळपास ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर १ हजार ८२५ शेतकरी नैसर्गिक शेती करीत आहेत. यातून विषमुक्त अन्नधान्य उत्पादित करीत आहेत.

योजनेची उद्दिष्टे काय आहेत?

■ रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबविणे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता व आरोग्य सुधारणे, रसायनमुक्त, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे आदी वैशिष्ट्ये या योजनेची आहेत.

शेतकरी गटातून जोडले शेतकरी

सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी गटाच्या माध्यमातून जोडले जात आहे. त्यांना आत्मा, कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात १२० गटांतील तब्बल १ हजार ८२५ शेतकरी एकत्र जोडण्यात आले असून, हे शेतकरी सेंद्रिय शेती करीत आहेत.

उत्पादन कमी; मात्र भाव मिळतो

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती फायद्याची आहे. यातून उत्पादन कमी मिळत असले तरी शेतमालाला चांगला भाव मिळतो. उत्पादन खर्चात मोठी बचत होते. सध्या सेंद्रिय पिकांना मागणी आहे.

२०२४-२५ मध्ये ३५०० चे उद्दिष्ट

जिल्ह्यात यंदा म्हणजेच २०२४-२५ मध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सेंद्रीय शेती (हेक्टरमध्ये)

कळमनुरी    १०००
वसमत  ८००
हिंगोली  ५००
सेनगाव १०००
औंढा नागनाथ१०००

सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी संख्या

कळमनुरी           ३००
वसमत               ४५०
हिंगोली              १२५
सेनगाव                  ६००
औंढा नागनाथ           ३५०
टॅग्स :शेती क्षेत्रसेंद्रिय शेतीशेतकरीशेतीकृषी योजना