राज्यासह जगभरातील अर्थव्यवस्था आणि राजकारण बदलण्याची ताकद असणारा कांदा एकूणच आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पिकवला जातो असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
दैनंदिन गरजेचा असलेला कांदा एका गावाचं संपूर्ण रूप बदलू शकतो असं म्हटलं तर अनेकांना धक्का बसेल. पण उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील अंदरसुल गावाचं हे उदाहरण नक्कीच विचार करण्यासारखं आहे.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत वसलेलं अंदरसुल हे सरासरी २५ ते ३० हजार लोकसंख्येचं गाव आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या या गावात गेल्या दशकाभरापूर्वी अल्प प्रमाणात पिकणारा कांदा आज अंदरसुलच्या प्रत्येक शेत जमिनीच्या तुकड्यात घेतला जातो.
अलीकडे पालखेड डावा कालवा, पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा आदी कालव्यांच्या मदतीने गाव पाणीमय झालं आहे. परिणामी, आता उशिरा लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये सतत गाजत असलेल्या येवला तालुक्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या अंदरसुल गावात आज रुग्णालयापासून ते विविध दैनंदिन वस्तूंच्या दुकानांपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे.
या सर्व बदलांचे अर्थकारण मुख्यतः परिसरात उत्पादित होणाऱ्या कांद्यावर आधारित आहे असं येथील कांदा खरेदीदार व्यावसायिक दत्तू सोनवणे सांगतात.
वडिलांच्या काळी कांदा दुर्मिळ फक्त खरिपापुरता मर्यादित होता. माझ्या पिढीने कांद्याचे उत्पादन वाढवले, लेट खरिप कांद्यापर्यंत मजल मारली. काही वर्षांपूर्वी मुलं, नातू शेतात रुजू झाले. आता लेट उन्हाळा कांदा देखील आमच्या शेतात होतो. तुषार, ठिबक सिंचन, गादीवाफा, बेड पद्धतीमुळे कांदा उत्पादन सोपे झाले आहे. गावात बाजारपेठ निर्माण झाल्याने विक्रीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, परिणामी गावाचा पैसा गावातच फिरतो त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे. – संजय ढोले पाटील, जेष्ठ कांदा उत्पादक शेतकरी.
आज गावामध्ये राजकारणापासून ते गावाच्या विकासापर्यंत जी प्रगती दिसत आहे ती सर्व कांद्यावर आधारित आहे. परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांची विविध दुकाने आहेत. आजच्या ग्रामपंचायतीत सरपंचापासून सदस्यांपर्यंत सर्व कांदा उत्पादक आहेत. एकंदरीत आज गावाचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण केवळ कांद्यावर आधारित आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. – रविंद्र मारुती वाकचौरे उपसरपंच, अंदरसुल.
अंदरसुल कांदा मार्केटची वार्षिक उलाढाल
वर्ष २०२३-२४ कांदा विक्री करिता आलेले शेतकरी | ७० हजार |
वर्ष २०२३-२४ कांदा खरेदी विक्री | १०,९७६,५९ क्विंटल |
वर्ष २०२३-२४ अंदरसुल कांदा मार्केटची आर्थिक उलाढाल | १,३७,१२,८७,१७७ रु. |
(सौजन्य : सहसचिव कृउबा समिती येवला. )
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी