Join us

वातावरण बदलामुळे कांद्याचा वांधा, बुरशीजन्य रोगामुळे उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 1:13 PM

शेतकऱ्यांकडून औषधांची फवारणी: उत्पादनात होणार घट

वातावरणातील बदल, वाढलेली थंडी आणि बुरशीजन्य आजारामुळे हस्तपोखरी (ता. अंबड) परिसरातील कांदा पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असून, केलेला खर्चही हाती पडतो की नाही, याची चिंता या भागातील शेतकऱ्यांना सतावत आहे.अंबड तालुक्यातील हस्तपोखरी हा परिसर कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. परंतु, यावर्षी कमी पाऊस असल्याने कमी क्षेत्रावरच बियाण्यांचा कांदा लागवड झाला. २०० हेक्टरांवर कांदा लागवड हस्तपोखरी परिसरात होते. परंतु, जलस्रोतांना पाणी नसल्याने केवळ ७० ते ७५ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे.वाढलेली मजुरी, बियाण्यांसह इतर साहित्याचे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. असे असले तरी या भागातील शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यांची लागवड करून जोपासना सुरू केली आहे. परंतु, कधी पाऊस, कधी धुके, कधी धुई यामुळे कांद्याच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्या भागात कांदा उगवला आहे, तेथे बुरशीजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च करावा लागत आहे.

लासलगाव, पिंपळगावला काय कांदा बाजारभाव मिळाला? आज पुन्हा घसरण 

शेतकरी म्हणतात...

मी तीन एकरांत कांद्याची लागवड केली आहे. वातावरण बदलामुळे पीक चांगले आले नाही. आलेल्या पिकावरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे केलेला खर्च हाती पडेल की नाही याची चिंता आहे.- सतीश सोनवणे, शेतकरी.

खते बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, कृषी विभागाचे आवाहन

वाढलेले बियाण्यांचे दर, वाढलेली मजुरी, खत, फवारणीसह इतर बाबींवर होणारा खर्च हा वाढला आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करीत कांदा लागवड केली. परंतु, नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. - ज्ञानेश्वर सावंत, शेतकरी

शेतकऱ्यांचा पारंपरिक पिकांवरच भर

◆ परिसरातील अनेक शेतकरी कंपन्यांशी करार करून कांदा लागवड करतात. कंपनी शेतकऱ्याच्या दारी येते. प्रतवारीनुसार भाव ठरवून कांदा बियाणे घेऊन जाते. पावसाअभावी कांद्याचे क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरच भर दिला.

◆ परंतु, ज्यांनी कांद्याची लागवड केली, त्यांच्यासमोर आज अनेक आव्हाने आहेत. बुरशीजन्य आजारामुळे कांद्याचे उत्पादन कमी होण्याची भीती असून, केलेला खर्चही हाती पडतो की नाही याची चिता या भागातील शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :कांदाहवामानपीक