Join us

प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी हे करा तरच मिळणार कर्जमुक्ती योजनेचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:05 AM

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील १६,२६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३२.४२ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

रत्नागिरी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील १६,२६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३२.४२ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

८०६ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण न केल्याने त्यांना १८ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. २०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज ३० जून, २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड केलेली असेल, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज ३० जून, २०१९ पर्यंत पूर्णतः फेडलेले असेल, २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णतः फेडलेले असल्यास प्रोत्साहनपर लाभ दिला जातो.

अथवा या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जो नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची व्याजासह पूर्णतः परतफेड केलेली असेल, अशा शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ दिला जातो.

या योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे, त्याबाबत आधार प्रमाणिकरण न केलेल्या ८०६ शेतकऱ्यांना महा-आयटीमार्फत संदेश देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी. एस. सी. सेंटर अथवा आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क करून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाने केले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु, अद्याप आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी १८ सप्टेंबरपर्यंत नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी. सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. - डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), रत्नागिरी

टॅग्स :पीक कर्जशेतकरीशेतीराज्य सरकारसरकारबँकसरकारी योजनाआधार कार्डरत्नागिरी