Join us

संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2023 10:09 AM

जिल्हाधिकारी कटियार यांनी काही संत्रा बागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व यावर उपाययोजनांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कुलगुरूंशी संवाद साधला.

संत्र्याच्या आंबिया बहराची ४८५६५ हेक्टरमध्ये ७४ टक्के फळगळ झाल्याचा कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल आहे. त्याचे पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी २९ ऑगस्टला दिले आहेत. जिल्ह्यात संत्राबागांचे क्षेत्र ८२४४६ हेक्टर आहे. सर्वाधिक ६५२०५ हेक्टरमध्ये आंबिया बहराचे उत्पादन घेतले जाते. त्या तुलनेत मृग बहर ८८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा आंबिया बहराची फळे पक्व होण्याच्या अवस्थेत असताना अचानक फळगळ सुरू झाली.

लोकमतद्वारा या बातम्यांद्वारे सातत्याने पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी कटियार यांनी काही संत्रा बागांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व यावर उपाययोजनांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कुलगुरूंशी संवाद साधला. कृषी विभागालादेखील उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, फळगळ वाढतीच असल्याने आता जिल्हाधिकारी कटियार यांनी कृषी यंत्रणेला पंचनाम्याचे आदेश दिले.

आंबिया बहराची जिल्हास्थिती (हेक्टर)उत्पादनक्षम क्षेत्र  ७४०३७आंबिया बहर क्षेत्र  ६५२०५फळगळीचे क्षेत्र  ४८५६५फळगळ ७४%संत्र्याचे क्षेत्र ८२४४६

वरुड, चांदूर बाजार, अचलपूर तालुक्यात सर्वाधिक गळकृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४९५६५ हेक्टरमध्ये आंबियाची गळ झालेली आहे. यामध्ये वरुड तालुक्यात सर्वाधिक २३७३५ हेक्टर, चांदूरबाजार ८९५६ हेक्टर, अचलपूर ५६२५, मोर्शी ५९८८४ अंजनगाव सुर्जी ३५४०, तिवसा १९७५, धामणगाव रेल्वे १३५५ व चांदूर रेल्वे तालुक्यात २४५ हेक्टरमध्ये संत्र्याची फळगळ होत आहे.

फळपीक विमा परतावा मिळण्यासाठी निकष नाहीतफळ पीक विमा योजनेमध्ये फळगळती हा निकष समाविष्ट नसल्याने योजनेत सहभागी शेतकऱ्यांना परतावा मिळणार नाही. त्यामुळे कृषी विभागाद्वारा पंचनामे करण्यात येऊन संयुक्त स्वाक्षरी अहवालाद्वारे जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे मदतनिधीची मागणी केल्यास शेतकऱ्यांना शासनाचा मदत निधी मिळण्याची शक्यता आहे.

संत्र्याच्या आंबिया बहराची काही भागात फळगळ होत आहे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन नुकसानीचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल त्वरित मागितला आहे. - उदय आगरकर उपसंचालक कृषी

टॅग्स :शेतीशेतकरीफळेखरीपअकोला