Join us

Plastic Flowers : बंदी असूनही प्लास्टिकच्या फुलांचा वापर; हायकोर्टाची केंद्र, राज्य सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 9:13 PM

Plastic Flowers : ग्रोवर फ्लॉवर्स असोशिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला नोटिसा पाठवल्या असून प्लास्टिकच्या वापरासंदर्भात प्रतिज्ञापत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

पुणे : सरकारने १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली असतानाही प्लास्टिकच्या फुलांचा वापर सुरू आहे. यासंदर्भात ग्रोवर फ्लॉवर्स कौन्सिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला नोटिसा पाठवल्या असून प्लास्टिकच्या वापरासंदर्भात प्रतिज्ञापत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे फूल उत्पादकांना फटका बसत आहे. दिवाळी, दसरा, नवरात्री आणि गणपती उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या फुलांचा वापर होतो यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फुलांचे दर पडतात. देशांत प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही प्लास्टिकचे फुले कोणत्या आधारावर वापरले जातात असा सवाल ग्रोवर फ्लॉवर्स कौन्सिलने केलाय. 

परदेशातून आयात होतात प्लास्टिकचे फुलेभारतात चीन, तैवान, दुबई, श्रीलंका, थायलंड, हॉगकाँग आणि ईटलीतून प्लास्टिकच्या फुलांची आयात होते. राज्य सरकारने ८ मार्च २०२२ रोजी १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली होती. त्यानुसार १०० मायक्रॉनपेक्षा कमी आणि ३० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिकच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. 

काय म्हणाले कोर्ट?कोर्टाच्या म्हणण्यानुसार, १०० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी असेल तर प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्यात काहीच अडचण नाही. प्लास्टिकच्या फुलांचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन प्रशासन हे प्रकरण गांभीर्याने हाताळतील अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्र सरकार, राज्य सरकार, पर्यावरण आणि वन मंत्रालय, एमपीसीबी यांनी चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावे.

प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे फुल शेती धोक्यात आली असून त्याचबरोबर फुलशेतीवर आधारित असलेले उद्योगही धोक्यात आले आहेत. दरम्यान, प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने आणि प्लास्टिकच्या उत्पादनासाठी केमिकलचा वापर केला जात असल्याने मातीचे प्रदूषणही होते. प्लास्टिक फुलांच्या वापरावर लवकरात लवकर बंदी घालायला हवी. - धनंजय कदम (GM, Grower Flowers Council Of India) 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीफुलं