पुणे : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४१ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यातून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे.
यासाठी राज्य व केंद्र सरकारला १ हजार २२९ कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे. योजनेत गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी सहभागाची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठीच्या सहभागाची मुदत ३१ मार्च आहे.
गतवर्षी खरीपात एक रुपयांत पीक विमा उपलब्ध होता. यंदा रब्बी हंगामातही ही योजना सुरू असून, शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४१ लाख ९ हजार ७८४ विमा अर्ज दाखल केले आहेत.
यात सर्वाधिक १३ लाख ५६ हजार ८५३ अर्ज लातूर विभागातून आले आहेत. त्या खालोखाल १० लाख ३६ हजार १२८ अर्ज छत्रपती संभाजीनगर विभागातून आले आहेत.
सर्वात कमी ६१ अर्ज कोकण विभागातून आले. गेल्या वर्षी या योजनेत ७१ लाख ८७ हजार १८२ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा गहू, हरभरा, कांदा पिकांना १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
विमा संरक्षण २९.४० लाख हेक्टरला
● आतापर्यंत आलेल्या अर्जांमधून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. तर १२ हजार ३२८ कोटी ६७ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली आहे.
● शेतकऱ्यांना अर्ज करताना केवळ १ रुपया भरावा लागत असून, शेतकऱ्यांच्या आलेल्या अर्जामधून ४१ लाख ९ हजार ५४२ रुपये जमा झाले आहेत. तर विमा कंपन्यांना विमा हप्त्यापोटी राज्य सरकारला ७५१ कोटी ८३ लाख रुपये, तर केंद्र सरकारला ४७७ कोटी ३६ लाख असे एकूण १ हजार २२९ कोटी ६१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
जिल्हानिहाय अर्जाची संख्या याप्रमाणे
रायगड ७
रत्नागिरी १४
सिंधुदुर्ग ४०
नाशिक १,८९,७९९
धुळे ३१,६०७
नंदुरबार ५,६४९
जळगाव ८६,६०५
अहिल्यानगर ३,९७,१८५
पुणे २२,३२९
सोलापूर १,६३,०५४
सातारा ५५,०७४
सांगली ८३,९१८
कोल्हापूर ३,४१९
संभाजीनगर २,०५,६०७
जालना ३,६६,५८१
बीड ४,६३,९४०
लातूर २,९७,०९१
धाराशिव २,३४,८०३
नांदेड ३,०१,८५३
परभणी ४,२२,९२४
हिंगोली १,००,१८२
बुलढाणा २,८८,६९६
अमरावती २७,६५९
अकोला ९४,८४६
वाशिम ८१,१८०
यवतमाळ ९७,६९६
वर्धा ३५,३५२
नागपूर ३५,९९९
भंडारा २,०३८
गोंदिया ९०८
चंद्रपूर १३,३८६
एकूण ४१,०९,७८४
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत ऑनलाइनद्वारे सहभाग नोंदवावा, गेल्या वर्षी सुमारे ७१ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे