Join us

संत्रा आणि मोसंबी फळपिकातील फळगळ त्यावरील उपाययोजना

By बिभिषण बागल | Published: August 20, 2023 6:00 PM

सद्यस्थितीत आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत तर मृग बहाराची ज्वारी ते वाटाणा दाणे अवस्थेत आहेत. साधारणतः पाण्याचा ...

सद्यस्थितीत आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत तर मृग बहाराची ज्वारी ते वाटाणा दाणे अवस्थेत आहेत. साधारणतः पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केलेली लागवड, झाडातील संजीविकांचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा, कर्ब-नत्र यांचे संतुलन, संतुलित पोषण यामुळे फळे झाडावर परिपक्व होईपर्यंत टिकण्यास मदत होते. मात्र सतत पावसाने जमीन संपृक्त होणे व त्यानंतर उघाड होऊन वाढलेले तापमान, कमी पालवी व फळांची झाडावर अधिक संख्या, अपुरे पोषण अशा वातावरणात आंबिया बहारातील फळपिकांवर विपरीत परिणाम होतो.

वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळपावसाळ्यात सतत पाणी साचून जमीन संपृक्त होते, झाडाच्या मुळ्यां कुजतात, मुळ्यांना प्राणवायू अल्प किंवा मिळत नसल्याने श्वसनक्रिया बाधित होते परिणामी विकसनशील फळांवर त्यांचा परिणाम होऊन ती पिवळी होऊन गळून पडतात. त्याचबरोबर अपुरे पोषण आणि संजीविकांचा असमतोलपणा निर्माण झाल्यास पेशीक्षय होऊन फळगळ होते. या गळ मध्ये संत्रा/मोसंबीचा पिवळेपणा हा देठापासून सुरू होतो व खालपर्यंत पसरून गळ होते बरेचदा देठाजवळपिवळ्या छटा दिसतात. 

बुरशीजन्य फळगळसंत्रा फळझाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडिआ व ऑल्टरनेरिया या बुरशीमुळे होते. या बुरशींचे संक्रमण फळांच्या देठांस होऊन फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात व तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशींचे बीजफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात, परिणामी आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते.

किटकजन्य फळगळफळझाडांवर प्रादुर्भाव करणाऱ्या किटकांपैकी प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात फळमाशी किडींमुळे फळगळ दिसून येते. तसेच ऑगस्ट च्या शेवटी रस शोषण करणाऱ्या पतंगाचा उपद्रव होऊन फळगळ संभवते.

व्यवस्थापनवनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ व्यवस्थापना करिता खालील उपाययोजना कराव्यात

बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे.सतत पावसाचे पाणी साचून राहल्यास बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.- झाडांवर गळून पडलेल्या फळांना खोल खड्यात दाबून त्यांची विल्हेवाट लावावी.फळबागेत फळांचे ढीग कुठेही ठेवू नका कारण ते कीड व रोगाचे प्रसार करण्याचे काम करतात.आंबिया बहाराची वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ व्यवस्थापन करिता एनएए १ ग्रॅम (१० पिपीएम) किंवा २-४ डी* १.५ ग्रॅम (१५ पिपीएम) किंवा जिब्रेलिक अॅसिड १.५ ग्रॅम (१५ पिपीएम) सह एन एटीसीए (N Acetyl - Thiazolidine 4 Carboxylic Acid) (१० पिपीएम) १ ग्रॅम + ब्रासिनोलाइड (४ पिपीएम) ०.४ ग्रॅम + फॉलिक अॅसिड (१०० पिपीएम) १० ग्रॅम + १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून १५ दिवसाच्या अंतराने अश्या दोन फवारण्या कराव्यात.मृग बहाराची फळे वाटाण्या एवढी असल्यास गळण संभवते या करिता एनएए (१ ग्रॅम) १० पिपीएम किंवा २-४ डी* १.५ ग्रॅम (१५ पिपीएम) + युरिया १ किलो (१%) + १०० लिटर पाणी असे द्रावण करून फवारणी करावी.झाडावर पानांची संख्या कमी व पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास कॅल्शियम अमोनियम नायट्रेट (१ किलो) + जिब्रेलिक ॲसिड १.५ ग्रॅम + १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक सल्फेट ५ ग्रॅम फेरस सल्फेट १ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन अंबिया फळांकरिता ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी करावी.

बुरशीजन्य रोगापासून होणारी फळगळ व्यवस्थापना करिता खालील उपाययोजना कराव्यात

- सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. वाफा स्वछ ठेवावा.- बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे कारण जिकडे पाणी साठून राहते त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीची लागण अधिक होते.- फायटोफ्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ व फळावरील तपकिरी कुज ब्राऊन रॉट' चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसिटिल एएल" २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड * ५० डब्लूपी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. तसेच या द्रावनांची फवारणी करीत असतांना वाफ्यात सुद्धा यांची जमिनीवर फवारणी करावी.- बुरशीनाशकाचे द्रावण टाकल्या नंतर ५ दिवसांनी १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व १०० ग्रॅम सुडोमोनास १ किलो शेणखतात मिसळून प्रती झाड देण्यात यावे. कोलेटोट्रीकम बुरशीजन्य फळगळसाठी बोर्डेक्स ०.६ टक्के मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी २.५ ग्रॅम किंवा अझोक्सस्ट्रोबिन + डायफेनकोणाझोल १ मिलि प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

किटकजन्य फळगळ व्यवस्थापना करिता खालील उपाययोजना कराव्यात.

- फळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रुपांतर होत असताना १०-१५ दिवसाच्या अंतराने फळ तोडणी होईपर्यंत ५ टक्के निंबोळी अर्क (५०० ग्रॅम/१० लिटर पाणी) किवा निंबोळी तेल (निम ऑईल) १० मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.- फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्याकरिता फळमाशी सापळे प्रती हेक्टरी २५ याप्रमाणात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून किवा तोडणीच्या साधारण २ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत.- बागेतील खाली पडलेली फळे वेचून खड्यात पुरून बाग स्वछ ठेवावी.- साधारणत: सायंकाळीच्या वेळी (७ ते रात्री ११) या कालावधी मध्येबागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.- रसशोषण करणाऱ्या पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करुन बागेत ठेवावे. याकरिता २० ग्रॅम मॅलॅथिऑन ५० ईसी २० मिली + २०० ग्रॅम गुळ + खाली पडलेल्या फळांचा रस (४०० ते ५०० मिलि) २ लिटर पाण्यात मिसळून प्रत्येकी दोन आमिषे रुंद तोंडाच्या पसरट भांड्यात टाकून २५ ते ३० झाडामध्ये ०१ या प्रमाणात लटकुन ठेवावेत.(नोंद: *लेबल क्लेम शिफारस नाही, संशोधनावर आधारित आहे)

अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे) डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला९८८१०२१२२२ | ई -मेल: aicrpfruits@pdkv.ac.in 

टॅग्स :फळेशेतकरीशेतीपीकविद्यापीठअकोला