Shetkari Anudan : शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देत पिकांची निगा राखतात त्यातच अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने त्रास झालेल्या शेतकऱ्यांना (farmers)शासनाकडून मदत मिळाल्यास दिलासा मिळतो. (Shetkari Anudan)
परंतु, जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावाने आलेले अनुदान (farmers subsidies) लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षामध्ये अतिवृष्टी, गारपिटीसह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली.
शासनाने आठ जीआर काढून तब्बल १ हजार ५५० कोटींची मदत लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केलेली आहे. मात्र, अंबड आणि घनसावंगी तालुक्यात बोगस लाभार्थ्यांनी अनुदान घेतल्याचे उघड झाले आहे. (Shetkari Anudan)
या प्रकाराच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली. शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे.
२०२३ आणि २०२४ या काळात जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. दोन वर्षाच्या काळात शासनाकडून मदतीचे दहा जीआर काढण्यात आलेले आहेत.
या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल १ हजार ५५२ कोटींचा निधी वाटप करण्यात आलेला आहे. प्राथमिक चौकशीमध्ये तब्बल ५० कोटी रुपयाचे अनुदान बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले असल्याचे उघड झाले आहे.
अधिकाऱ्यांचे लॉगिन
* अनुदान लाटण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांच्या लॉगिनचा वापर केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यामुळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लॉगिनचा वापर केला कोणी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
* अनुदान प्राप्त झालेल्या सर्व खातेदारांची चौकशी समितीकडून सुरू करण्यात आलेली आहे. दहा वेळा प्राप्त झालेल्या अनुदानातून तब्बल १५ लाख खात्यामध्ये मदत जमा करण्यात आलेली आहे. यात काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
समितीकडून चौकशी सुरू
* मागील वर्षी प्रशासनाकडे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे.
* या प्रकरणाची व्याप्ती बघता जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अनुदान वाटपाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत ८० गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे. रक्कम जमा झालेल्या पंधरा लाख खात्यांची चौकशी सुरू आहे.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई
बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अनुदान वाटपाची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. - गणेश महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना