Soil Testing :
विवेक चांदूरकर :
मातीमध्ये कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता आहे. त्याचे परीक्षण करून त्यानुसार खते देण्याकरिता शेतकऱ्यांकडून दरवर्षी माती परीक्षण केले जाते.
खामगाव जिल्ह्यात माती परीक्षणासाठी दीड महिन्यांपूर्वी नमुने पाठविण्यात आले आहे. मात्र, अर्धा खरीप हंगाम संपला, तरीही अहवाल शेतकऱ्यांपर्यंत पोहाचला नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पिकांना कोणती खते द्यावीत, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत.
९३६० नमुन्यांची तपासणी
कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात मातीचे नमुने बुलढाणा येथील माती एका हेक्टर शेतामधील एक यानुसार परीक्षणाकरिता पाठविण्यात आले. नमुने पाठवून दीड महिना झाला. मात्र, अद्याप नमुने प्राप्त झाले नाहीत. यावर्षी चांगला पाऊस असल्यामुळे जून महिन्यातच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.
जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील पेरणी आटोपली. त्यानंतर सध्या शेतात पिकांना खते देण्यात येत आहे. शेतात पिकांना खत देताना मातीमध्ये ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, त्यानुसारच खत देण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात येतो. आवश्यक खते दिली व अनावश्यक खते देण्याचे टाळले तर मातीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
तालुकानिहाय तपासणीसाठी पाठविलेले नमुने
बुलढाणा ७९३
चिखली ७२०
मोताळा ९४५
मलकापूर ७२०
खामगाव ७२०
शेगाव ७४०
नांदुरा ७२१
जळगाव जामोद ६४९
संग्रामपूर ३९९
मेहकर ७२०
लोणार ७४०
देऊळगाव राजा ७२३
सिंदखेड राजा ७७०
एकूण ९३६०
'लेट लतिफी'चा शेतकऱ्यांना फटका
• माती परीक्षण लॅबमधून ९ हजार ३६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. १५ ते २० दिवसांपूर्वीच ही तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत संबंधितांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतरही बुलढाणा येथील लॅबमध्ये जाऊन अहवाल आणण्यात आले नसल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
•अजूनपर्यंत अहवाल तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात आले नसून, त्यानंतर ते शेतकऱ्यांपर्यंत केव्हा पोहोचतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
• यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन आरोग्यपत्रिका काढण्यात आल्या. यापूर्वी ऑनलाइन आरोग्यपत्रिका काढण्यात येत नव्हत्या.
शेतात खत टाकणे सुरू
• जमिनीचा पोत कसा आहे त्यानुसार पिकांची निवड करण्याकरिता माती परीक्षणाची गरज असताना आता अर्धा हंगाम संपला तरी अद्याप अहवाल मिळाले नाहीत. त्यामुळे
शेतकरी त्यांच्या माहितीनुसारच शेतात खते टाकत आहेत.
अहवाल येण्यास विलंब
मातीचे परीक्षणाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. जिल्ह्यात एकच लॅब आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर त्वरित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
- संदीप निमकर्डे, तालुका कृषी अधिकारी, खामगाव