जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांपैकी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'त (solar agriculture pump scheme) एक लाख ५० हजार ३०४ सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने पूर्ण केले आहे.
सौर कृषी पंप बसविण्यात जालना (Jalana) जिल्हा राज्यात अव्वल असून, जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांनी हे पंप बसविले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभर दिवसांत म्हणजे १६ मार्चपर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्ट निश्चित केली होती. महावितरणने या कालावधीत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत एकूण दीड लाख पंप बसविण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.
६ डिसेंबर रोजी ९७,२९५ सौर कृषी पंप बसविण्यात आले होते. त्यानंतर ४ फेब्रुवारीपर्यंत महावितरणने ५३ हजार ००९ सौर कृषी पंप बसविले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपांची संख्या १,५०,३०४ झाली आहे.
महावितरणला (Mahavitarana) शंभर दिवसात ५२,७०५ पंप बसवायचे उद्दिष्ट होते; पण साठ दिवसांत ५३,००९ सौर पंप बसविण्यात आले. यात जालना जिल्ह्यात १८ हजार ४९४ पंप बसिवण्यात आले आहेत, तर बीड जिल्ह्यात १७ हजार ९४४, अहिल्यानगर जिल्ह्यानेही १३ हजार ३६६ पंप बसवून आघाडी घेतली आहे.
९० टक्के अनुदान
* मागेल त्याला सौर कृषी पंप या राज्य सरकारच्या (State Government) योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते.
* त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो.
* अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के असून त्यांना २५ टक्के अनुदान मिळते.