Join us

एकरकमी ३५०० रुपये टाका, मगच ऊस तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 9:49 AM

गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीशिवाय टनास ४०० रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही, असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या बाविसाव्या विराट ऊस परिषदेत केला.

गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीशिवाय टनास ४०० रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही, असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या बाविसाव्या विराट ऊस परिषदेत केला. चालू हंगामातील उसाला एकरकमी ३५०० उचल मिळाल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.

या परिषदेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह कर्नाटकातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'कोण म्हणते देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. मागच्या हंगामातील उसाला ४०० रुपये द्यावेत या मागणीसाठी शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढली. त्यालाही कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील गावोगावी मोठा प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेचा समारोप परिषदेच्या ठिकाणी झाला. तिथे माजी खासदार शेट्टी यांनी आंदोलनाचा कृती कार्यक्रम जाहीर केला.

ते म्हणाले, मी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे म्हणून २२ दिवस पायपीट केली; परंतु राज्यातील सत्तारूढ व विरोधी गटानेही आमची दखल घेतली नाही. कारखानदार जर शेतकऱ्यांना टनास ४०० रुपये देणार नसतील तर माझ्या शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार नाही, म्हणून मी सुद्धा माझ्या स्वतःच्या घराकडे जाणार नाही. याच मैदानावर १५ नोव्हेंबरपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहे.

यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, महेश खराडे यांची भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर सतीश काकडे, संदीप जगताप, प्रकाश पोफळे, राजेंद्र गड्याण्णावार, डॉ. महावीर अक्कोले आदी मान्यवर उपस्थित होते. शैलेष आडके यांनी स्वागत केले. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले.

कारखाना अध्यक्षांना खर्डा-भाकर नेऊन द्याधनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज या चारही दिवशी शेतकऱ्यांनी कांदा, खर्डा-भाकर घेऊन आपापल्या परिसरातील कारखान्यांच्या अध्यक्षांना नेऊन द्यावी व त्यांना आमची दिवाळी तुमच्यामुळे खर्डा खाऊन होत असल्याची आठवण करून द्यावी, असा कृती कार्यक्रम दिला.

पहिली उचल घेताना दुसरा हप्ताहीपहिली उचल ३५०० रुपये दिली म्हणजे सगळे संपले असे नाही. यावेळी साखरेचा भाव बाजारात कसा आहे हे पाहून दुसया हप्त्याचीही मागणी करणार असल्याचे प्रा. जालंदर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :साखर कारखानेऊसस्वाभिमानी शेतकरी संघटनाराजू शेट्टीशेतकरीकोल्हापूर