Join us

निवडणुकीची चाहूल; गहू, तांदूळ, डाळींचे भाव घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 1:14 PM

केंद्र सरकारने महागाई नियंत्रणासाठी रोखली भाववाढ, पहा कशाकशाच्या किमती झाल्या कमी?

लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे; तसेच नवीन धान्याचे बाजाराला वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत गव्हापाठोपाठ, ज्वारी, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला लागले आहेत. निवडणुकीत महागाईचा मुद्दा आड येऊ नये म्हणून केंद्र सरकारने भाववाढ रोखण्यासाठी विविध पावले उचलल्याने त्याचा परिणाम आहे.

गव्हाचे उत्पादन विक्रमी होण्याचे संकेत

यंदा रब्बी हंगामात देशात ११.४ कोटी टन नवीन गव्हाचे उत्पादन होण्याचा अनुमान आहे. यामुळे तेजीची मानसिकता बदलली व क्विंटलमागे २०० रुपयांनी भाव कमी होऊन २८०० ते ३४५० रुपये दर आहेत. गव्हापाठोपाठ ज्वारीचे भाव ८०० रुपयांनी कमी होऊन शाळू ज्चारी ५००० ५०० ते ते ५५०० रुपये, तर कर्नाटकी ज्वारी ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्चिटल विकली जात आहे.

तांदळातही मंदी

यंदा तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. निर्यातीमुळे तांदळाचे भाव वधारले होते. मात्र, सरकारी गोदामातील तांदूळसुद्धा आता कमी किमतीत म्हणजे ३० ते ३५ रुपये किलोने आहे. परिणामी, स्थानिक बाजारात मिळणार तांदळाचे भाव क्विंटलमागे ३०० ते ७०० रुपयांनी कमी होऊन ३६५० ते १० हजार रुपये आहेत.

आणखी भाव कमी होतील

यंदा ज्वारी, तुरीचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यात गव्हाचे उत्पादन विक्रमी होत आहे. नवीन तुरीची आवक वाढत आहे. नवीन गहू, ज्वारीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल. यामुळे भाव कमी होऊ शकतात. -नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी

भारत ब्रँड'च्या नावाने स्वस्तात विक्री

लोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. यामुळे भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने 'भारत बँड'च्या नावाने स्वस्त धान्य दुकान, तसेच आता मॉलमध्ये आटा, तांदूळ व डाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अजून सरकारी आटा, तांदूळ व डाळ शहरातील मॉलमध्ये विक्रीला आला नाही. मात्र, कमी किमतीत डाळींची विक्री शहरात होत आहे; तसेच सरकारकडे गोदामात मुबलक प्रमाणात धान्य, तांदूळ आहे. परिणामी, मोंढ्यात आटा, तांदूळ, डाळींचे भाव कमी होऊ लागले आहेत.

डाळीमध्ये मंदी

दिवाळीनंतर पहिल्यांदाच डाळींच्या भावात मंदी आली आहे. हरभरा डाळीच्या भावात १००० रुपयांनी कमी झाले. सध्या ६३०० ते ६६०० रुपये प्रतिक्चिटल आहे. तुरीची डाळ २५०० रुपयांनी स्वस्त होऊन १२०० ते १२६० रुपये, तसेच ७०० ते ८०० रुपये घसरण होऊन मूगडाळ ९५०० ते १०२०० रुपये किलो, मसूर डाळ ५०० ते ७०० रुपयांनी मंदी येऊन ७५०० ते ८००० रुपये आहे.

टॅग्स :निवडणूकभात