Join us

: शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांचे भविष्य होणार सुरक्षीत; केंद्र सरकारने आणली आहे एक भन्नाट योजना वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 7:14 PM

मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने 'एनपीएस वात्सल्य' योजना सुरु केली आहे. वाचा सविस्तर (NPS Vatsalya Scheme)

NPS Vatsalya Scheme :

केंद्र सरकार सध्या विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून गरजु, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता केंद्र सरकारने नवीन एक योजना सुरु केली आहे. मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने 'एनपीएस वात्सल्य' योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे. जुलै २०२४ मध्ये सरकारने या योजनेची सुरुवात केली होती.

या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षीत करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे. पालक ऑनलाइन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत खाते उघडू शकतात.

खाते उघडण्यासाठी किमान योगदान १ हजार रुपये आहे. त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान १ हजार रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत.मुलाला वयाची १८ वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रुपांतर नियमीत पेन्शन योजनेत होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे.

खाते कोणाला उघडता येणार?

ज्या मुलांचे वय 18 वर्षांखाली आहे, त्यांचे एनपीएस वात्सल्य खाते उघडू शकता. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित ‘एनपीएस’ खात्यात रूपांतरित होईल.

वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावरच खात्यातून निवृत्तिवेतन (पेन्शन) मिळेल.

'एनपीएस' ने समभाग, कर्ज रोखे आणि जी-सेकमधील गुंतवणुकीतून अनुक्रमे १४ टक्के, ९.१ टक्के आणि ८.८ टक्के परतावा दिला आहे.

अटी आहेत तरी काय?

* १८ वर्षापर्यंतची सर्व मुले या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

* खाते फक्त मुलांच्या नावाने उघडली जातील, मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील

* सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये खाते उघडता येईल किंवा ई-एनपीएसद्वारे देखील तुम्ही खाते उघड शकता.

* हे खाते उघडण्याची कमीत कमी मर्यादा ही १ हजार रुपये असणार आहे.

* या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही

* खात्यात जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळेल

* तीन वर्षानंतर 25 टक्के रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार

* मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल

* मुल 18 वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही

* खात्याला तीन वर्षाच्या लॉक-इन कालावधीनंतर २५ टक्के रक्कम शिक्षण, आजार, अपंगत्वासाठी काढता येईल.

आई-वडील तसेच पालकांना अल्पवयीन मुलांच्या वाढदिवसानिमित्त तसेच इतर प्रसंगी एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक करता येईल. - निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

टॅग्स :शेती क्षेत्रमहिला आणि बालविकासकृषी योजनाशेतकरीशेतीनिवृत्ती वेतन