Join us

Saur Krushi Pump Yojana : महावितरणची ही योजना शेतकऱ्यांमध्ये ठरली लोकप्रिय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:34 AM

magel tyala saur krushi pump yojana शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंतर्गत राज्यातील तब्बल ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतावर सौरपंप बसविण्यात आले आहेत.

पुणे : शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंतर्गत राज्यातील तब्बल ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतावर सौरपंप बसविण्यात आले आहेत.

केवळ सहा महिन्यांतच महावितरणने शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्यांना दहा टक्के तर अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. दिवसा वीजपुरवठा आणि लोडशेडिंग किंवा बिलाची चिंता नाही, असे सौर कृषी पंपांचे वैशिष्ट्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री कुसुम बी या योजनेच्या आधारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार महावितरणकडे फेब्रुवारीत २ लाख ७० हजार अर्ज प्राप्त झाले होते.

त्यापैकी १ लाख ६४ हजार ४६४ शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरली असून त्यापैकी ५० हजार ४१० अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसविण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतात लवकरच पंप बसविण्यात येतील, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

महावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली असून त्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर नव्याने दाखल झालेल्या अर्जावरही काम सुरू आहे.

राज्य सरकारने दहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात.

सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते.

शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते.

अधिक वाचा: महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेला घरबसल्या अर्ज करणे झाले सोपे

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपाणीवीजसरकारराज्य सरकारमहावितरण