गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७जिल्ह्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाला, फळपिकांनाही अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील सुमारे पावणेसहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
ज्यामुळे बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार १७जिल्ह्यांत शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
ज्वारी, मका, बाजरीसह केळी, द्राक्ष, डाळिंब बागांमध्ये फळगळती
• एकूण १३ हजार १९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात गहू व हरभरा या रब्बी पिकांचा समावेश आहे. ज्वारी, मका बाजरी तसेच भाजीपाला पिके व केळी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, पपई, संत्रा व चारापिकांचेही नुकसान झाले आहे.
• सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून येथील सहा तालुक्यांमध्ये ५ हजार ७९५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
• त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ५ हजार ४२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करण्यास महसूल व कृषी विभागाने सुरुवात केली आहे.
जिल्हानिहाय नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)
लातूर - ४६
सांगली - १८६
कोल्हापूर - २०
सोलापूर - १५०
सातारा - १२
नाशिक - ५७९५
नंदुरबार - ३७८
बुलढाणा - ५०४२
अकोला - २२
अमरावती - १
यवतमाळ - २६
अहील्यानगर - ८९२
पुणे - १४
सिंधुदुर्ग - १७
रत्नागिरी - १३
लातूर - ५१४
परभणी - ६६
एकूण - १३१९४