पॉलिसीच्या आधारे विम्याचा दावा क्लेम करताना अडचणी येत असतील संबंधित व्यक्तीचा हिरमोड होतो. विम्याशी संबंधित कंपनी किंवा एजंट यांच्याकडून नीटपणे मदत केली जात नाही.
अशावेळी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) तक्रार निवारणासाठी उभारलेल्या यंत्रणेची मदत घेता येते. सर्वप्रथम, तुम्हाला विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करता येते.
तक्रार निवारण अधिकारी ठराविक कालावधीत तोडगा काढण्यास बांधील असतो. जर १५ दिवसांपर्यंत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर 'आयआरडीएआय'कडे तक्रार नोंदवता येते.
'आयआरडीएआय'कडे १५५२२५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो अथवा complaints@irdai.gov.in या ई-मेल आवश्यक दस्तऐवजांसह तक्रार करता येते.
किंवा ऑनलाइन पोर्टल 'आयजीएमएस' वरही तक्रार नोंदवता येते. 'आयआरडीएआय'कडून तक्रार संबंधित विमा कंपनीकडे पाठवली जाते. विमा कंपनी ठराविक वेळेत तक्रारीचे निवारण करण्यास बांधील असते आणि विमाधारकास उत्तर दिले जाते.
जर विमा कंपनीकडून मिळालेल्या उत्तराने समाधान झाले नाही, तर तुमची तक्रार पुढे विमा लोकपालकडे पाठवता येते. तक्रार नोंदवताना लेखी स्वरूपात पावती किंवा संदर्भ क्रमांक घ्यावा जो पुढील कार्यवाहीवेळी उपयोगी पडतो.
आयजीएमएस पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवल्यास नीटपणे पाठपुरावा करणे शक्य होतो, तसेच अंतिम निर्णय येईपर्यंत कार्यवाहीची स्थिती काय आहे, हे तपासता येते.
अधिक वाचा: पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर