Join us

खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 7:01 PM

ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे असते.

सर्वसाधारणपणे असा समज आहे की खरीप हंगामात येणारी पिके पावसाच्या पाण्यावर विनासायास येतात. कोरडवाहू क्षेत्रात हा समाज चुकीचा नाही कारण अशा क्षेत्रात दुसरे पाणी देण्यासाठी काही साधन नाही उपलब्ध नसते. मात्र ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे असते. तसे पाहिले तर रब्बी हंगामात घेतलेल्या पिकापेक्षा खरीप हंगामातील पिकाची पाण्याची गरज जास्त असते. त्यामुळे स्वाभाविकपणे बाष्पीभवनाचा वेग ही जास्त असतो. साधारणपणे पिकाची पाण्याची गरज ही ते पीक आपल्या माध्यमातून वातावरणाच्या गरजेनुसार किती पाणी वातावरणात सोडते यावर अवलंबून असते. खरीप हंगामात वातावरणाची पाण्याची गरज रब्बी किंवा हिवाळी हंगामापेक्षा जास्त असल्याने खरीप हंगामात घेतलेल्या पिकाची पाण्याची गरज त्यामुळे रब्बी हंगामातील पिकापेक्षा जास्त असते. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात घेतलेली बहुतांशी पिके खरीप हंगामात पडलेल्या पावसाच्या पाण्यावर हा पाऊस जमिनीत मुरल्यानंतर च्या ओलाव्यावर घेतली जातात. त्याकरिता रब्बी पिकांचे नियोजन खरिपात पडलेल्या पावसानुसार केले जाते. मात्र खरीप पिकांच्या बाबतीत असे होत नाही. बरीचशी खरीप पिके ही जून महिन्यात पडलेल्या पहिल्या दुसऱ्या पावसावर घेतली जातात आणि नंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे त्या पिकांना  नियमित पावसाच्या स्वरूपात पाणीपुरवठा होईल याची शाश्वती नसते आणि म्हणूनच खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. पिकाची पाण्याची गरज भागवण्याचे जे चार निकष ठरवले गेले आहेत त्या प्रत्येक निकषाला निश्चितच महत्त्व आहे. ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी देणे,जमिनीतील ओलावा 50 टक्के उडून गेल्यानंतर पिकास पाणी देणे हे दोन निकष पडणाऱ्या पावसाच्या अनियमितपणा पाहता खरीप हंगामातील पिकास तंतोतंत लागू पडत नाही. 

खरीप हंगामात सर्वसाधारणपणे दररोजचे बाष्पीभवन ७ ते ८ मी.मी. एवढे असते एखाद्या पिकास एकूण ७५ मी. मी. बाष्पीभवन झाल्यानंतर पाणी द्यायचे असल्यास खरीपातील पिकास १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी देणे आवश्यक असते. मात्र मधल्या कालावधीत पाऊस झाला व तोही कमी जास्त प्रमाणात झाला, तर हे निकष तंतोतंतरीत्या पाळणे अवघड बनते. 

मात्र चौथा व शेवटच्या पिकाच्या संवेदनक्षम अथवा नाजूक अवस्थेत विकास पाणी देणे हा निकष खरीप पिकांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा आहे कारण इतर वेळी कितीही पाऊस झाला तरी पिकांच्या वाढीच्या नाजूक अवस्थेत पिकास जमिनीतून ओलावा उपलब्ध झाला नाही तर इतर सर्व घटक पुरेशा प्रमाणात दिले गेले असले तरीही पीक उत्पादनात कमालीचे घट येते. म्हणून खरीप हंगामात ठराविक अवस्थेत पाणी देणे गरजेचे असते.

- डॉ. कल्याण देवळाणकर

टॅग्स :खरीपपाणीलागवड, मशागतपीक व्यवस्थापन