Join us

Chilli Market बाजारपेठेत आवक वाढली अन मिरचीचे भाव ५० टक्क्यांनी घसरले; उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 1:10 PM

ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ५० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ही मिरची ११० रुपये किलोने विक्री झाली होती.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ५० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ही मिरची ११० रुपये किलोने विक्री झाली.

परंतु, रेणुकाई पिंपळगाव येथील बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने ५० रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुरुवातील १० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले होते.

त्यापाठोपाठ ९ ते १० हजारांपर्यंत भाव खाली आले. परंतु, बुधवारी हे भाव तर ५ ते ६ हजारांवर आल्याने शेतकऱ्यांचा फवारणी, निंदणीसह तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. यंदा तालुक्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारात सर्वाधिक हिरवी मिरची दाखल झाली आहे. एका शेतकऱ्याला एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च लागला आहे.

एप्रिलपासून मिरचीचा दुसरा तोडा तोडणे सुरू आहे, सुरुवातीला काळी मिरचीला ११० रुपये किलो दर होता. आता ही मिरची ५० रुपये किलोने विक्री होत आहे. सुरुवातीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, बुधवारी अचानक भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर पसरला आहे.

यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांत मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. परंतु, १० जुलै रोजी अचानक भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. यात तोडणीची मजूरी, गाडीभाडेही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा उन्हाळी मिरचीची सर्वाधिक लागवड

• शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. चांगला भाव मिळतो, म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली.

• परंतु, सध्या भोकरदन तालुक्यासह इतर भागांत मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे धावडा, रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

तोडणीसाठी द्यावे लागते ५ रु. प्रतिकिलोने पैसे

मिरचीचे रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्यांना एका एकरसाठी अंदाजित ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. यात एक किलो मिरची तोडण्यासाठी ५ रुपये मजुरी द्यावी लागते. यंदा तोडणी आणि वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

बाजारपेठेत ठोक मिरचीचे भाव

 पूर्वीचे दरबुधवारचे भाव
काळी मिरची १२०५०
रुवेलरी (पांढरी)८०४५
शिमला ६०२५
बळीराम ७०३०
पिकेडोर८०३५

मिरची उत्पादक शेतकरी तोट्यात

सध्या बाजारपेठेत मिरचीची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. विक्री न झाल्यास फेकून द्यावा लागेल. या भीतीपोटी बुधवारी व्यापाऱ्यांनी मागितलेल्या भावात मिरची देऊन टाकली आहे. यंदा मिरचीवर रोगाचा प्रादूर्भाव अधिक झाल्याने उत्पादक शेतकरी तोट्यात आहे.  - माणिक तांगडे, मिरची उत्पादक शेतकरी.

भावामध्ये चढ- उतार सुरुच

या आठवड्यात उन्हाळी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भावामध्ये चढ- उतार होत आहे. बाजारपेठ परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे मिरचीचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यात मिरचीला चांगला दर मिळाला होता. - भगवान तांगडे, व्यापारी, वडोद तांगडा.

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :मिरचीबाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रपीकजालनामराठवाडाभोकरदन