संजय चव्हाण
मांजर्डे : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील २० ते २५ टक्के बागा डिसेंबर व जानेवारी महिन्यात काढणीला येतील, असेही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. मागील २ ते ३ वर्षे वातावरणातील अनियमितता यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
तासगाव पूर्व भागातील मणेराजुरी, सावळज, गव्हाण, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी, शिंदेवाडी, तसेच खानापूरमध्ये बेनापूर, सुलतानगादे व सांगोला भागात कोळे येथे काही द्राक्ष उत्पादक प्रतिवर्षी हंगामपूर्व फळ छाटणी जुलै व ऑगस्टमध्ये घेतात.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी एखादाच प्लॉट काढणीला आला आहे. यामध्ये पूर्व भागातील काही बागांचा समावेश आहे. जिल्ह्यात द्राक्षांना ४४० रुपये प्रति चार किलो दर मिळाला आहे. पूर्व भागातील द्राक्षांना दर्जानुसार ४२० ते ४५० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो.
डिसेंबर-जानेवारीमध्ये द्राक्षबागांची काढणी
▪️यावर्षी जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेकांनी सप्टेंबरऑक्टोबरपर्यंत फळ छाटण्या घेतल्या. सप्टेंबरमधील द्राक्षबागांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
▪️चार महिने कालावधी गृहीत धरता डिसेंबर व जानेवारीदरम्यान मार्केटिंगसाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांची फळ काढणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये बेदाण्यासाठीच्या उत्पादित बागांचीही काढणी सुरू होणार आहे.
व्यापारी अजूनही दाखल नाहीत
▪️पावसाळी परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यात फळ छाटणी उशिरा झाल्याने व्यापारी अजून दाखल झाले नाहीत.
▪️तरीही दराने चांगली सुरुवात केली असून, ३५० ते अगदी ५०० रुपयांपर्यंत दर्जा पाहून दर मिळतील, अशी अपेक्षा उत्पादक करीत आहेत.
▪️असे असले तरी सध्या हंगामपूर्व काढणी सुरू असलेली द्राक्षे दर उच्चांकी घेतील, अशी आशा आहे.
द्राक्ष निर्यात नोंदणीला वाढता प्रतिसाद
द्राक्ष निर्यात नोंदणीला द्राक्षबागायतदारांकडून प्रतिसाद वाढत आहे. जिल्ह्यात ७,०७३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. यामध्ये ६९७ नव्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदणी झाली आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये अधिक निर्यात नोंदणी झाली आहे