Join us

शुभ्र काजूची आयात ठप्प; पांढऱ्या सोन्याचे दर गगनाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 4:32 PM

दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रथम दर्जाच्या शुभ्र रंगांच्या काजूची आयात बंद झाली आहे. स्थानिक पातळीवर कारखान्यांच्या संख्येत वाढ केल्याने काजू बाहेर पाठविण्यास त्या देशाने बंदी घातली आहे. याचा परिणाम या ठिकाणाहून येणाऱ्या काजू मालावर अवलंबून असणाऱ्या देशात काजूचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पांढरे सोने म्हणून हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाची परदेशातून होणारी आयात ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भारतात काजूचे दर आभाळाला भिडले आहेत. किलोला सरासरी २०० रुपयांनी दर वाढले आहेत. यंदा हवामान बदलाचाही मोठा फटका या पिकाला बसल्यामुळे स्थानिक उत्पादनातही मोठी घट आहे. उत्पादन आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने, एकीकडे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच काजू उद्योग अडचणीत येत आहे.

दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रथम दर्जाच्या शुभ्र रंगांच्या काजूची आयात बंद झाली आहे. स्थानिक पातळीवर कारखान्यांच्या संख्येत वाढ केल्याने काजू बाहेर पाठविण्यास त्या देशाने बंदी घातली आहे. याचा परिणाम या ठिकाणाहून येणाऱ्या काजू मालावर अवलंबून असणाऱ्या देशात काजूचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात काजूचे ४० टक्के उत्पादन होते. एक ते दोन महिनेच पुरतील, इतका काजू उपलब्ध असल्याने व्यापारी त्यांचा साठा करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काजूचे दर आभाळाला भिडले आहेत. देशात पहिल्या दर्जाच्या काजूचे दर १,०४० रुपये किलो, तर दुसऱ्या क्रमांकाच्या काजूचे दर ९४० रुपये झाले आहेत. हा दर यापूर्वी अनुक्रमे २०० रुपयांनी कमी होता.

जगामध्ये भारताचा काजू लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. जागतिक काजू अर्थव्यवस्थेत तो महत्त्वाचा घटक आहे. आयव्हरी कोस्ट आणि बेनिन येथून भारतात पहिल्या क्रमांकाचे कच्चे काजू येतात, ज्याचा रंग शुभ्र असतो. हा दिसायला जरी आकर्षक असला, तरी भारतातील विशेषतः कोकणातील काजू चवीला उत्कृष्ट आहेत. देशात केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही प्रमुख काजू उत्पादक राज्ये आहेत. यापैकी महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त उत्पन्न घेतले जाते. येथे सुमारे १.६० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली आहे, तर ३ लाख टन एवढे काजूचे उत्त्पन्न मिळते. राज्यातील काजूला परदेशात मोठी मागणी आहे. यातून देशाला परकीय चलन मिळते.

काजूचे दर आणि क्षेत्रफळ

  • गावठी : ९४० रुपये किलो
  • वेंगुर्ला : १,०५० रुपये किलो
  • काजूचे क्षेत्र (महाराष्ट्र) : १.६० लाख हेक्टर
  • भारत) : ५ लाख ७० हजार हेक्टर
  • वार्षिक उलाढाल : २०० कोटींहून अधिक
  • काजू उत्पादन : ३ लाख टन
  • काजू बोंडनिर्मिती : ६० टक्के
टॅग्स :कोकणफलोत्पादनशेती