रूपेश उत्तरवार
यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात (Kharif Season) जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातूनच विक्रेत्यांनी २४ लाख पॅकेट्सची नोंदणी केली आहे. २०७ कोटी रुपयांचे कापसाचे बियाणे जिल्ह्याला लागणार आहे.
यासोबतच सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका यासह विविध पिकांच्या बियाणांसह खताची २०० कोटींची उलाढाल जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. हा हंगाम कॅच करण्यासाठी ३३० कंपन्या जिल्ह्यात स्पर्धेत उतरल्या आहेत. (Kharif Season)
यासोबतच सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका या बियाणांची मागणी विक्रेत्यांनी कंपन्यांकडे नोंदविली आहे. बियाणाची ही उलाढाल ३०० कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. हा हंगाम कॅच करण्यासाठी कंपन्यांनी विक्रेत्यांशी थेट संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Kharif Season)
आपल्याच कंपनीचे सर्वाधिक बियाणे विक्री व्हावे म्हणून कंपन्यांनी काही योजना जाहीर केल्या आहेत. यात राज्यात विविध पर्यटन स्थळांवरच्या भेटी निश्चित केल्या आहेत. विशेषतः बियाणाची विक्री लक्षात घेता गतवर्षी कंपन्यांचे बियाणे विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विक्रेत्यांचा दूर मार्चपूर्वीच पूर्ण करण्यात आला आहे.
४ लाख २१ हजार हेक्टरवर होणार कापसाची लागवड येणाऱ्या हंगामामध्ये आपल्यालाच सर्वाधिक महसूल विक्रीतून प्राप्त व्हावा म्हणून प्रत्येक कंपन्या प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी गावपातळीवर होर्डिंग्ज लावण्यापासून भिंती रंगविण्याचे कामही ते करीत आहेत.
एकूणच विक्रेत्यांनाही विविध प्रकारची प्रलोभने कंपनी एजंटांकडून दिली जात आहेत. त्यामुळे बियाणे खरेदी करताना ग्राहकांना चांगले बियाणे कोणते हे शोधताना चांगलाच कस लागणार आहे. गुणवत्ता आणि तांत्रिक बाबी खरेदी करताना तपासाव्या लागणार आहेत.
पाच लाख हेक्टरवर होणार कापसाची लागवड
जिल्ह्यात चार लाख ९१ हजार १९८ हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. त्या खालोखाल दोन लाख ६५ हजार २९८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. एक लाख आठ हजार ३५३ हेक्टरवर तूर असणार आहे, तर चार हजार हेक्टरवर मूग आणि उडदाचा पेरा राहणार आहे.
२० हजार क्विंटल ज्वारीचे बियाणे; खरिपातील पेरणीचे नियोजन
यावर्षी खरीप हंगामासाठी ज्वारीचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. २० हजार क्विंटल बियाणे बुक करण्यात आले आहे, तर यापाठोपाठ ११ हजार ९१९ क्विंटल तुरीचे बियाणे बुक करण्यात येणार आहे.
सोयाबीनचे ६९ हजार क्विंटल बियाणे
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ६९ हजार ६४० क्विंटल सोयाबीनच्या बियाणाची मागणी नोंदविण्यात आली आहे. यासोबतच ग्रामीण बीजोत्पादन, महाबीज आणि एनएससीकडूनही बियाणाचा पुरवठा केला जाणार आहे. सोयाबीनचे लागवड क्षेत्र यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे.
मक्याचे क्षेत्र वाढणार
यावर्षी शेतमालाला चांगले दर नसल्याने जिल्ह्यात मका पिकाचे लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकरी अधिक उत्पादन असल्याने या क्षेत्राकडे शेतकरी वळतील. यामुळे विक्रेत्यांनी मक्याच्या बियाणाची मागणी नोंदविण्यासाठी सुरुवात केली आहे. यामुळे काही दिवसात शेती क्षेत्राचा नवा पॅटर्न पहायला मिळणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Bajar Bhav : बाजारात पिवळ्या सोन्याला पुन्हा झळाळी! वाचा सविस्तर