Join us

kharip hamibhav : सोयाबीनच्या राशीला सुरूवात; नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:28 PM

बाजारात सोयाबीनची आवक घटली असून, हमी दराची केंद्र कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत(kharip hamibhav)

kharip hamibhav

विनायक चाकुरे/ उदगीर : येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या राशी सुरू झाल्या आहेत. बाजारात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली असून, ओलाव्यानुसार ३ हजार ६०० ते ४ हजार २०० पर्यंत दर मिळत आहे.

हा दर शासनाने घोषित केलेल्या हमी दरापेक्षा ७०० रुपयांनी कमी असल्याने आता हमी दराचे केंद्र सुरू झाल्यानंतरच सोयाबीनची विक्री करावी, असा मानस शेतकऱ्यांचा झाला आहे.

परिणामी, बाजारात सोयाबीनची आवक घटली असून, हमी दराची केंद्र कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. खरिपाचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या राशी मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.

सोयाबीनच्या राशी सुरू झाल्या तसे बाजारात दरसुद्धा कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्पादन खर्च व बाजारात मिळणारा दर पाहता शेतकऱ्यांच्या हाती काहीही शिल्लक नसल्याचे गणित आजतरी दिसून येत आहे.

मागील तीन वर्षांपासून सोयाबीनमुळे शेतकऱ्यांना फायद्यापेक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी तरी शेतकऱ्याला सोयाबीनच्याउत्पादनातून मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

तसेच उदगीर तालुक्यात सध्या सरकारकडून रामचंद्रराव पाटील तालुका खरेदी विक्री संघ व रंगराव पाटील खासगी बाजार समिती या ठिकाणी नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या दर कमी असल्याने आवक घटल्याचे चित्र बाजारात आहे.

ओलावा किती घेणार?

बाजारात सोयाबीन १० टक्के मॉइश्चर असलेला माल चांगल्या प्रकारे समजला जातो. तर त्यापेक्षा जास्त असलेल्या प्रति टक्याला १ किलोची कपात करण्यात येते. परंतु हमी दराच्या केंद्रावर सरकार मॉइश्चरमध्ये किती सूट देणार व प्रति हेक्टरी किती क्विंटल खरेदी करणार याबाबत कुठल्याही सूचना नाही. अतिरिक्त उत्पादन झालेले पिकाची नेमकी शासन भूमिका काय करणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

सोयापेंडीला मागणी नाही, कारखानदार हतबलवास्तविक केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये वाढ केली आहे. त्यातच सोयाबीनचे प्रमुख उत्पादन असलेल्या सोयापेंडीला पोल्ट्री व्यवसायाकडून मागणी नसल्यामुळे नवीन सोयाबीन बाजारात येऊनसुद्धा प्रक्रियादार कारखानदारांकडून मागणी कमी असल्याने सोयाबीनला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मक्याच्या उत्पादनामुळे सोयाबीनला फटका...

इथेनॉलच्या निर्मितीमध्ये मक्याचा वापर वाढला असल्याने मक्याची मागणी वाढली आहे. मक्यापासून तयार होणारी पेंड पोल्ट्री व्यावसायिकांना कमी दरामध्ये उपलब्ध होत असल्याने सोयाबीनऐवजी मक्याच्या पेंडीला प्राधान्य खरेदी करत असल्याने सोयाबीनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ कधी येईल याबाबत व्यापाऱ्यांमध्येच साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबतच प्रक्रियादार कारखानदारांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड