- अजय पालीवाल
जळगाव : मार्च महिना सुरू झाला आहे. दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहे. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पिकांचे नुकसान झाल्याने आता जनावरांना लागणारा चारासुद्धा महागला आहे. पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असताना दादरच्या कडब्याचा भाव प्रतिशेकडा ३२०० रुपये मोजावा लागत आहे.
लासूर परिसरात दादरची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. कांदा, कापूस, हरभरा, गहू या पिकाकडे कल अधिक आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी व हरभरा पिकांचे (Harbhara Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ज्वारी, हरभरा पिकांचा पेरा कमी झाल्याने पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याची कमतरता भासू लागली.
तसेच कुट्टी तयार करण्यासाठी प्रति शेकडा ५०० रुपये तर वाहतूक खर्च ५०० रुपये असा फटका बसत आहे. यामुळे पशुपालकांसमोर संकट उभे राहिले आहे. यामुळे लासूरला जळोद यासह इतर परिसरातून चारा आणावा लागत आहे. चाऱ्याचे दर वाढल्याने पशुपालकांना झळ बसत आहे. जनावरांना लागणारा चारा आता महागला असून, टंचाई निर्माण होत आहे. जनावरांना पोषक चारा म्हणून कडब्याला मागणी असते. यासाठी पशुपालक धडपड करताना दिसत आहेत.
दादरचे भाव कमी, चाऱ्याचे अधिक
परिसरात दादर २६०० ते ३००० असा दर आहे. पण, चारा यापेक्षा अधिक महाग आहे. शेतकऱ्याला एक पेंडी ४० रुपयाला पडत आहे. उन्हाळ्यात इतर चारा नसल्याने कोरड्या चाऱ्याची साठवणूक करावी लागते. दादरचे भाव ३२०० रुपये प्रति शेकडा तसेच कुट्टी करण्यासाठी प्रति शेकडा ५०० रुपये तर वाहतूक खर्च ५०० असे ४२०० रुपये प्रतिशेकडा खर्च येत आहे. इंधनाचे दर वाढल्याने कुट्टी मशीनवाल्यांनी दर वाढवल्याचे त्यांनी सांगितले.
परिसरात दादरपेक्षा चाऱ्याचे भाव जास्त आहेत. आधीच पशू सांभाळणे अवघड झाले आहे. त्यात चारा दर वाढला आहे. उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात गुरे चारायला सोडता येत नाही. यामुळे कोरडा चान्याची साठवणूक करावी लागते.
- संदीप महाजन, दुग्ध व्यावसायिक
दुधाचे दर कमी
दादर व चाऱ्याला भाव व्यवस्थित मिळाला तर पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मात्र, चान्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दादरपेक्षा कडबा महागला आहे. घरात चारा आणायचा झाला तर ४२०० ते ४५०० शेकडा चाऱ्याची कुट्टी घरात पडते. त्या तुलनेत मात्र दुधाचे दर कमी आहेत.
- भय्यासाहेब पाटील, पशुपालक
चारा भरण्यासाठी पशुपालकांची लगबग सुरू
बैलगाडे, ट्रॅक्टर आदी वाहनांनी हा चारा खळ्यात, गोठ्यापर्यंत नेण्यासाठी लगबग सुरू आहे. तर, काही पशुपालक शेतातच कुट्टी करून मिळेल त्या वाहनाने घेऊन जात आहेत. मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाचा चटका बसत आहे. या रखरखीत उन्हात पशुपालक चारा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.