Join us

Rice MSP : 14 वर्षांत भाताच्या एमएसपीत किती रुपयांची वाढ झाली? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:47 PM

Paddy MSP : एकीकडे १४ वर्षात उत्पादन खर्च दुपटीने वाढला असताना मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 

Agriculture News : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याच्या वल्गना प्रत्येक सरकारकडून केल्या जात असल्या तरी गेल्या १४ वर्षांत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. गेल्या १४ वर्षांत शेतकऱ्यांच्या धानाला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आधारभूत किमतीत केवळ २१८२ रुपयांची दरवाढ मिळाली आहे. एकीकडे १४ वर्षात उत्पादन खर्च दुपटीने वाढला असताना मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 

२०११-१२ मध्ये साधारण धानाला (Paddy Crop) प्रतिक्विंटल १०८० रुपये असा दर होता, २०२०-२१ मध्ये तो १८६८ रुपये आहे. बियाणे, खते, कीटकनाशके यासह मजुरीच्या दरात दीड ते दोन पटीने खर्च वाढला आहे विदर्भातील गडचिरोली, पूर्व गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांसाठी धान हेच मुख्य पीक आहे. धानाशिवाय इतर पिकेसुद्धा घेतली जातात. मात्र, त्यांचे प्रमाण अल्प आहे. पूर्वविदर्भात या धानाच्या पट्ट्यात चंद्रपूरशिवाय इतर जिल्ह्यांत उद्योग नाममात्रच आहे. त्यामुळे ७० ते ७५ टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो, त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा अपेक्षित पीक येत नाही. 

शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जात असला तरी त्यांच्या प्रगतीत फारसा बदल झालेला नाही. गेल्या १४ वर्षांपासून धानाच्या अल्पशा दरवाढीमुळे आज धानाचा दर जेमतेम २१८२ रुपये मिळत आहे. धान पिकासाठी उत्पादन खर्च एकरी २० हजार रुपयांपर्यंत आहे. एका एकरात सरासरी १२ ते १५ क्विंटल धानाचे उत्पादन होते. शासनाच्या हमीभावानुसार एकरी २२ ते २५ हजारांच्या घरात उत्पन्न मिळते. त्यामुळे खर्च वजा जाता एकरी २ ते ५ हजारापेक्षा अधिक मिळकत होत नाही. 

अशी होत गेली धानाला दरवाढ 

गेल्या १४ वर्षांतील धानाच्या हमीभावात झालेल्या दरवाढीवर एक नजर टाकल्यास शेतकऱ्यांच्या तोंडाला कशी पाने पुसली गेली हे दिसून येते. सन २०११-१२ या वर्षात साधारण धानाला १०८० रुपये प्रतिक्चिंटल असा दर होता. त्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारने १७० रुपयांची वाढ केल्याने सन २०१२-१३ मध्ये १२५० रुपये दर मिळाला. २०१३-१४ मध्ये ६० रुपये, तर २०१४-१५ मध्ये ५० रुपये दरवाढ मिळाली. त्यानंतर सन २०१५-१६ मध्ये ५० रुपये, २०१६-१७ मध्ये ६० रुपये आणि २०१७-१८ मध्ये ८० रुपये दरवाढ दिली. २०१८-१९ मध्ये तब्बल २०० रुपये दरवाढ मिळाली. मात्र, नंतर तेच चक्र सुरू आले. २०१९-२० मध्ये ६५ रुपये आणि २०२०-२१ साठी अवधी ५३ रुपये, तर सन २०२२ साली १९७५, तसेच २०२३ मध्ये २०५० रुपये आणि २०२४ वर्षात २१८२ रुपये तर यंदा २३०० रुपये असा दर आहे.

यांत्रिकीकरणाने वाढला रोवणी व आवत्याचा खर्च

पूर्वी पारंपरिक शेती अवजारांचा वापर करून शेती मशागतीची कामे व लागवड केली जात होती. आता यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने धान पीक लागवडीचा खर्च दुपटीपेक्षा वाढला आहे. त्या तुलनेत धानाच्या आधारभूत किमतीत वाढ झाली नाही. दरवर्षी किमान ५० ते ६० ते ६५ रूपये क्विंटलमागे वाढ दिली जात आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रभातशेतीनाशिक