Join us

Bangladesh Protest : भारत-बांगलादेश सीमा ‘सील’, भारतीय निर्यातदार ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत, वाचा सविस्तर 

By सुनील चरपे | Published: August 06, 2024 11:58 AM

Bangladesh Protest : बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने भारतातून हाेणारी निर्यात थांबली.

- सुनील चरपे 

नागपूर : बांगलादेशात (Bangladesh) यादवी माजली असून, पंतप्रधान शेख हसिना (Shaikh Hasina) पळून जाताच लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. बांगलादेशनेभारताच्या सीमा साेमवारी सायंकाळी सील केल्या आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने भारतातून हाेणारी निर्यात (India-Bangladesh Export Closed) थांबल्याने भारतीय शेतमाल निर्यातदारांनी सध्या ‘वेट ॲण्ड वाॅच’ची भूमिका घेतली आहे. तिथे खाद्यान्नाचे दर आकाशाला भिडणार असल्याने त्यांच्यासमाेर भुकेचे आव्हान उभे ठाकणार आहे.

बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, डाळी, बेसन, फळे, विशिष्ट प्रजातीचे मासे, भाजीपाला, कांदा (onion export) व इतर शेतमाल तसेच खाद्यान्न आयात करतात. या वस्तूंची भारतातून बांगलादेशात हाेणारी निर्यात किमान ७५ टक्के आहे. साेमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत भारतातून बांगलादेशात हाेणारी या शेतमालाची निर्यात सुरू हाेती. सायंकाळी सीमा सील करण्यात आल्याने ही निर्यात थांबली आहे, अशी माहिती भारतीय शेतमाल निर्यातदारांनी दिली.

भारत हा बांगलादेशचा परंपरागत शेतमाल आयातदार देश आहे. यादवीमुळे बांगलादेशात पुरवठा थांबल्याने खाद्यान्नाचा तुटवडा निर्माण हाेऊन दरवाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लष्करासमाेर सामान्य बांगलादेशी नागरिकांच्या भुकेचे आव्हान गंभीर रूप धारण करणार आहे. त्यांना भारताशिवाय इतर देशांकडून तातडीने शेतमालाची आयात करणे शक्य नाही. त्यामुळे आपण सध्या ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत आहाेत, अशी माहिती भारतीय निर्यातदारांनी दिली.

टकाचे अवमूल्यन व काळाबाजारनिर्मित परिस्थितीमुळे बांगलादेशी चलन टकाचे ४८ तासांत ३० टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. बांगलादेशात शेतमालाच्या किमती किमान ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या बांगलादेशात ज्या व्यापाऱ्यांकडे शेतमालाचा थाेडाफार साठा आहे, ते अधिक दाराने विक्री करीत आहे. हीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास शेतमालाचा काळाबाजार व किमतीने दुपटीपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणामसात महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यावेळी नेपाळमधील महागाई ४५ टक्क्यांनी वाढली हाेती. बांगलादेशाची अर्थव्यवस्था कापड उद्याेगावर अवलंबून आहे. तेथील परिस्थिती आणखी काही काळ अशीच कायम राहिली तर त्याचा बांगलादेशच्या कापड निर्यात व अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम हाेणार आहे.

भारतीय कापड उद्याेगाला फायदायादवीमुळे बांगलादेशचे ९० टक्के, तर भारताचे १० टक्के आर्थिक नुकसान झाले आहे. जागतिक स्तरावर कापड निर्यातीमध्ये बांगलादेशचा वाटा २४ टक्के आहे. ते सध्या भारताऐवजी ऑस्ट्रेलियातून रुई व सूत आयात करतात. यादवीमुळे ही आयात आणि त्यांची कापड निर्यात प्रभावित झाली आहे. याचा फायदा भारतीय कापड निर्यातदारांना नक्की हाेऊ शकताे. त्यासाठी भारतीय उद्याेगांनी कापडाचा दर्जा कायम राखणे आणि केंद्र सरकारने त्यांना मदत करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :बांगलादेशभारतसीमारेषाआंदोलनशेती क्षेत्र