Join us

Kanda Bajarbhav : काळजी नको, ‘या’ तारखेपर्यंत तरी कांदा बाजारभाव पडणार नाहीत, वाचा सविस्तर

By गोकुळ पवार | Published: August 28, 2024 3:46 PM

Kanda Bajarbhav : पोळ्यापर्यंत म्हणजेच २ सप्टेंबरपर्यंत सध्याचे कांदा बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता आहे. कारण..

Onion Market : सद्य:स्थितीत कांद्याला समाधानकारक बाजारभाव (Kanda Bajarbhav) मिळत आहेत. त्यामुळे काही अंशी का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरण्याची चर्चा होत असल्याने शेतकऱ्यांना भाव पडण्याची धास्ती आहे.

या पार्श्वभूमीवर ‘लोकमत ॲग्रो’ने कांदा बाजाराचा आढावा घेतल्यावर पोळ्यापर्यंत म्हणजेच २ सप्टेंबरपर्यंत सध्याचे कांदा बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे, सप्टेंबरमधील १० तारखेनंतरच बफर स्टॉक बाजारात येण्याची शक्यता नाफेडच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली असून तोपर्यंत आणि त्यानंतरही कांदा बाजारभावावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नसल्याची चिन्हं आहेत.

शनिवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी नाफेडकडून मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत  धिकृतरीत्या कांदा वाहतुकीसाठी आणि कांदा गोणींसाठी टेंडर काढण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच नाफेडचा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. टेंडर उघडण्याची तारीख २ सप्टेंबर २४ अशी असल्याने पोळ्यानंतर नाफेडचा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. दरम्यान रायपूरमध्ये ‘बफर स्टॉक’ मधील कांदा पाठविला जात असल्याची माहिती काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या अशा आहेत अडचणी

हवामान बदलामुळे पिकांना बसलेला फटका आणि केंद्र सरकारचे बदलते निर्यात धोरण यामुळे मागील वर्षभर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. निर्यात शुल्क वाढविल्याने निर्यातीला फटका बसला आणि कांदा बाजारभाव देखील गडगडले. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विक्री करावा लागला. आता मागील दोन आठवड्यापासून काहीसे दिलासादायक चित्र असून कांद्याला समाधानाकारक भाव मिळत आहेत.  आता थेट नाफेडचा कांदा बाजारात येऊ घातल्याचे संकेत दिसू लागले आहेत. नाफेडच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती समोर आली आहे. 

सध्याचे कांदा बाजारभाव कसे आहेत?

मागील आठवड्यातील कांदा बाजारभाव पाहिले असता लासलगाव बाजारात सरासरी किंमती रु. ३४२० प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत  टक्केनी वाढ झाली आहे. तर देशपातळीवरव राज्यात कांद्याच्या आवकंमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत एका ३ टक्क्याने घट झाली आहे. एकीकडे कांद्याला समाधानकारक भाव मिळत असताना दुसरीकडे नाफेडने कांद्याच्या वाहतुकीसाठी ट्रक मिळवण्यासाठी तसेच साठवणूक केलेला कांदा गोणीत भरण्यासाठी गोणी खरेदीचे टेंडर काढले आहे. 

हे टेंडर आहे तरी काय? 

१. कांदा वाहतुकीसाठी ट्रक निविदा नाफेड ने आपल्या नाफेड इंडिया डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळावर कांद्याचे वाहतुकीसाठी ट्रक आवश्यक असल्याची निविदा काढली आहे. यात नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि धुळे या जिल्ह्यातील नाफेड केंद्राकरिता हे केंद्र काढण्यात आले आहे. इच्छुक ट्रक मालकांना 2 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आले आहे. 

२  गोणी खरेदी निविदा दरम्यान नाफेडने दुसरं टेंडर हे कांदा पॅकींगच्या गोण्या खरेदीसाठी काढले आहे. साधारण पन्नास किलोच्या या बॅग असून जवळपास 31 लाख 57 हजार 630 बॅगची निविदा काढण्यात आली आहे. त्यातून सुमारे दीड लाख टन कांदा पॅकींग होऊ शकतो.  यात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात 06 लाख, चांदवड तालुक्यात 18 लाख, देवळा तालुक्यात 09 लाख 45 हजार, दिंडोरी तालुक्यात 01 लाख 78 हजार, कळवण तालुक्यात 20 हजार,  मालेगाव तालुक्यातील 3 लाख 12 हजार,  मनमाड तालुक्यातील 49 हजार, नांदगाव तालुक्यात 20 हजार, निफाड तालुक्यात 05 लाख 04 हजार, सिन्नर तालुक्यात एक लाख 90 हजार तर येवला तालुक्यात 24 हजार गोण्या आवश्यक असल्याचे त्यांनी या टेंडरमध्ये नमूद केले आहे. नाशिक सह पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्यांसाठी ही निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. यासाठी देखील अर्ज करावयाचा असून २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आले आहे. 

नाफेडचे म्हणणे काय? खरंच कांदा भाव पडणार?मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेडचा साठवलेला कांदा सप्टेंबरमध्ये येणार असल्याचे चित्र असले, तरी संबंधित निविदा उघडल्यानंतर संबंधितांना कामे देण्यात (वर्क ऑर्डर) साधारणत: आणखी ७ ते ८ दिवसांचा कालावधी जाणार आहे. थोडक्यात २ सप्टेंबर २४ ला निविदा उघडल्या आणि स्वीकारल्या गेल्या, तर पुढील कार्यवाहीसाठी १० ते ११ सप्टेंबरपर्यंत वेळ लागू शकेल, तोपर्यंत तरी बफर कांदा मार्केटमध्ये येण्याची शक्यता नाही, अशी अधिकृत माहिती नाफेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत ॲग्रो’ला दिली. त्यामुळे तोपर्यंत बाजारातील कांदा भाव नाफेडच्या बफर स्टॉकमुळे पडण्याची शक्यता कमी असल्याचे नाफेडचे म्हणणे आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाकडून (डोका) ‘तयारीत राहण्याच्या’सूचना नाफेडला आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असून नाफेडचा कांदा अधिकृत बाजारात कधी येणार हे त्यानंतरच ठरणार आहे.

कसे असतील कांद्याचे भाव? 

एफपीओंकडून खरेदी केलेल्या कांद्याची पहिल्या टप्प्यात ६३ टक्क्यांनी रिकव्हरी होणार असल्याने नाफेडने साठवलेल्या सुमारे २ लाख १० हजार टन कांद्यापैकी सुमारे १ लाख ५७ हजार टन कांदाच सध्या बाजारात येण्याची शक्यता असून तो टप्प्या टप्प्याने देशातील विविध भागात पाठवला जाईल. दररोज सुमारे ७०० ते ८०० टन कांदा बाजारात जाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दररोज सरासरी ४ ते ६ हजार टन कांदा खरेदी केला जात असून नाफेडकडून बाजारात उतरविला जाणारा रोजचा कांदा त्याच्या केवळ दहा ते १२ टक्के इतका असेल. परिणामी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतरही कांदा बाजारभावावर फारसा परिणाम होणार नाही असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की सध्या कांद्याची निर्यात बऱ्यापैकी सुरू असून दरवर्षी ऑगस्ट अखेर बाजारात येणारा कांदा कर्नाटकचा लाल वल्लोर कांदा यंदा खराब हवामानामुळे अजूनही आलेला नाही. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात आला तरी शेतकऱ्यांच्या कांदा २५ ते २७ रुपयांच्या खाली येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक परिस्थितीशी झुंजत आहेत. कांद्याला बाजारभाव नव्हते, म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागले. आता कुठंतरी समाधानकारक मिळत आहेत. अशातच केंद्र सरकारकडून कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे आताही चाळीमध्ये मुबलक प्रमाणात कांदा शिल्लक आहे. हाच कांदा विक्री होईपर्यंत केंद्र सरकारने नाफेडचा हा बफर स्टॉक बाजारात आणू नये. त्यापूर्वी नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये काळाबाजार झाला आहे, याची आधी चौकशी करावी. शेतकऱ्यांचा कांदा विक्री झाल्याशिवाय हा नाफेडचा कांदा बाजारात आणू नये, ही प्रमुख मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करणार आहेत.                                                                                                                          -  भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

सध्या नाफेड, एनसीसीएफकडून मूल्य स्थिरकरण निधी अंतर्गत बफर स्टॉकमधील कांदा काढण्याच्या जोरदार हालचाली चालू आहे. प्रत्यक्षात सरकारने माल बाजारात उतरवण्याची इतकी घाई करण्याची गरज नाही. कारण शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्चाच्या जवळपास दोन पैसे मिळत आहे. त्यामुळे सरकारने गोंधळ निर्माण करून कोणाचा स्वार्थ साधायचा आहे. कारण याच्या  खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात काय झालं? हे सर्वांना माहिती आहे. परत हा स्टॉक दिल्लीच्या आझादपूर बाजारात होलसेल व्यापाऱ्यांना दिला जाईल. परंतु चढ्या भावात ग्राहकांना देताना दिसतील. - निवृत्ती न्याहारकर, बळीराजा शेतकरी गट अध्यक्ष

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकशेती