Join us

Onion Issue : अफवांना बळी पडू नका, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन, नेमकं प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 1:27 PM

Agriculture News : कांद्याची टिकवण क्षमता बघून टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Onion Issue : सध्या कांद्याला (Onion rate) समाधानकारक असा दर मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात तसेच कांदा पट्ट्यात (Onion Farmer) अफवांचे मॅसेज फिरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता अशा मॅसेजकडे दुर्लक्ष करावे, कांद्याची टिकवण क्षमता बघून चांगला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे, असे आवाहन महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून करण्यात आले आहे. 

एकीकडे गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विक्री (Onion bajarbhav) करावा लागला. निर्यात बंदी, निर्यात शुल्क अशा वेगवगेळ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव कमी मिळत गेला. आता कुठे कांद्याला समाधानकारक भाव मिळत असताना बाजारात अफवांना पेव फुटले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी या अफवांकडे दुर्लक्ष करून टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणण्याची गरज आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे जमेल तेवढ्या अफवा पसरवून शेतकऱ्यांना घाबरवून कांद्याची आवक वाढवून भाव पाडण्याचे ठरवून काम सुरू झाले आहे. मात्र या अफवांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे संघटनेकडून सांगण्यात येत आहे. 

कांद्याला समाधानकारक भाव मिळू लागल्यानंतर कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी 'खरेदी-विक्री' योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून कांदा खरेदी करून बाजारात विक्री केला जाईल. याआधी केंद्र सरकारने किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अशी योजना राबविली आहे. त्यात भारत चणाडाळ ६० रुपये किलो, भारत आटा २७.५० रुपये किलो आणि भारत तांदूळ २९ रुपये किलो दराने विकण्यात आला. त्यामुळे आता कांद्याच्या बाबतीत हा प्रयोग करणार असल्याचे समजते. यातूनच कांद्याचे भाव पडणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र शेतकऱ्यांनी गोंधळून जाण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

कांदा उत्पादक संघटनेचे म्हणणं काय? 

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे की आपण घाबरून जाऊन कुठल्याही अफवेला बळी न पडता आपला कांद्याची टिकवण क्षमता बघून चांगला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे. आवक नियंत्रण ठेवून बाजारभावाचे सूत्र आपण आपल्याच हातात ठेवायची आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकार किंवा इतर कुठल्याही घटकाने थेट कांद्याचे बाजार भाव पाडण्याचे प्रयत्न केल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संबंधितांना जशास तसे उत्तर दिले जाईल. यासाठी चाळींमध्ये साठवणूक केलेले शेतकरी व ज्यांच्याकडे आता कांदा शिल्लक नाही, मात्र पुढे नवीन कांदा असणार अशा सर्व शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक संघटनेला भक्कम साथ द्यायची आहे. 

टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र