Join us

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या उधळणीतून लुट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:07 AM

तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लूट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे.

तासगाव : तासगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा सौदे बंद पाडून तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे नेते अमोल काळे यांनी दिला आहे. जिल्हा उपनिबंधकांना त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

'लोकमत'मध्ये 'व्यापार बेदाण्याचा शेतीमालाच्या लुटीचा' मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेने याबाबत आवाज उठविला आहे. काळे म्हणाले तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. 

काळे म्हणाले तासगाव येथे होत असलेल्या बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या बेदाण्याची उधळण होत आहे. अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लूट केली जात आहे. वर्षाला सुमारे एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. यातून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमवण्याचा कारभार चालू आहे.

शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला बेदाणा सौद्यामध्ये उधळून तो पायाखाली तुडवला जातो. वर्षाला तब्बल एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. उधळण झालेला बेदाणा अडते स्वतः ताब्यात घेऊन, पॉलिश करून तो पुन्हा विकतात हा बेदाणा किमान १०० रुपये प्रतिकिलो जरी विकला गेला, तरी सुमारे दहा कोटी पर्यंत फायदा अडत व्यापाऱ्यांचा होतो.

यातूनच कामगारांना बोनस, उचल दिल्या जातात. खुलेआम बेदाणा उत्पादकांची लूट होत असताना, बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन सोयीस्कर कानाडोळा करत आहे. अशा प्रकारे बेसुमारपणे बेदाणा उत्पादकांची लूट होत आहे, याला आळा बसणे गरजेचे आहे.

सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी योग्य ते निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच तासगावमध्ये होणारे सौदे बंद पाडण्यात येतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

शेतकऱ्यांची कोट्यवधीची लूट बेदाणा मार्केटमध्ये शेतकऱ्यांना प्रक्रियेपासून ते विक्रीपर्यंत अडते, व्यापारी व खरेदीदारांची साखळी तयार झाली आहे, याच साखळीतून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांना अॅडव्हान्स दिलेल्या रकमेवर सावकारी पद्धतीने व्याज आकारले जात आहे. असे सर्व मिळून सुमारे दोनशे कोटींपेक्षा जास्त रकमा देऊन त्यावर दोन टक्के व्याजाची आकारणी करून रक्कम वसूल केली जाते. यातून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :द्राक्षेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेतकरीशेतीमार्केट यार्डतासगाव-कवठेमहांकाळ