अनिल भंडारी
बाजारात सोया पेंडची मागणी घटल्याने तसेच इतर सोया प्लान्टकडून ही उठाव नसल्याने सोयाबीनच्या (Soybean) दरात घसरण सुरुच आहे. नाफेडने हमीदराने खरेदी बंद केल्यानंतर खुल्या बाजारात चांगला भाव मिळेल, असे वाटत असतानाच सोयाबीनचे दर गडगडलेलेच आहेत.
सोयाबीनला शासनाचा हमीभाव ४,८९२ रुपये असताना सध्या त्यापेक्षा कमी भाव मिळत आहे. जिल्ह्यात सध्या ३,८०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव सोयाबीनला (Soybean) भाव मिळत असून ४ हजाराचा उंबरठा अद्याप ओलांडलेले नाही.
बीड जिल्ह्यात शासनाच्या हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी नाफेडच्या वतीने ३० खरेदी केंद्र सुरू केले होते. केंद्र झाल्यानंतर जवळपास २४ हजार शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून राहिले, बाजारात भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
यावर्षी जिल्ह्यात पाऊसमान वार्षिक सरासरीपेक्षा दीडपट राहिले. तर अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसानही झाले. सरासरी उत्पादनात घट आली. त्यामुळे बाजारात आवक कमी असल्याने दर वाढण्याची अपेक्षा मात्र फोल ठरली आहे.
सोयाबीनचा भाव
१२ मार्च रोजी मिळालेला भाव | ३५०० - ४००० |
१७ मार्च रोजी मिळालेला भाव | ३८०० - ४१०० |
१८ मार्च रोजी मिळालेला भाव | ३८०० - ४००० |
१९ मार्च रोजी मिळालेला भाव | ४१०० |
अपेक्षा फोल
* शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पिकाला बाजार भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. नाफेडच्या खरेदीमुळे बाजारातील स्पर्धा वाढेल अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली.
* एकंदरीत उत्पादनाची सरासरी पाहता खुल्या बाजारातील दर शासकीय खरेदी नसली तरी किमान ५०० रुपयांनी अधिक राहिले असते, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र शासकीय खरेदी दरम्यान ही बाजारातील दर दबावतच राहिले. शासनाने खरेदी बंद केल्यानंतरही सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळत आहे.
* ४,८९२ रुपये हमीभाव असतानाही बाजारात ४ हजारांच्या आत भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.
'भावांतराचा लाभ द्यावा'
* २०२३-२४ च्या हंगामामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कापूस आणि सोयाबीनच्या दरात घसरण झाली. त्यामुळे शासनाने दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत कापूस व सोयाबीन पिकासाठी केली होती.
* यंदाच्या हंगामात या दोन्ही पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. कापूस व सोयाबीनसाठी भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांचे नुकसान
* बीड जिल्ह्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून नाफेडने जिल्ह्यातील ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २० हजार ९६९ शेतकऱ्यांचे ५ लाख २४ हजार २०१ क्विंटल सोयाबीन खरेदी करून सर्व ३० केंद्र बंद केले.
* मात्र नोंदणी केलेले २३ हजार ७७५ शेतकरी वंचित राहिले. अशा परिस्थितीत गरजेपोटी काहींनी सोयाबीन विकले तर काहींच्या घरात सोयाबीन पडून आहे.
* परिणामी शेतकऱ्यांना हमीदराच्या तुलनेत किमान २०० ते १ हजार रुपये नुकसान सोसावे लागले आहे.